फोटो सौजन्य - Social Media
सरकारी सेवेत स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि खासगी क्षेत्रातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर पोलिस भरतीकडे उच्चशिक्षित तरुणांचा ओढा लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहर व ग्रामीण पोलिस दलाच्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पदवीधर, पदव्युत्तर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे रोजगार बाजारातील वाढती स्पर्धा आणि शासकीय नोकरीकडे वळणारा कल अधोरेखित झाला आहे.
शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत १५० पोलिस शिपाई पदांसाठी तब्बल ७ हजार ६९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ग्रामीण पोलिस दलातील ४९ शिपाई आणि ४ बॅण्डस्मन अशा एकूण ५३ पदांसाठी ४ हजार ३४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शहर व ग्रामीण मिळून २०३ पदांसाठी १२ हजारांहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे.
या भरती प्रक्रियेत बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एमबीए तसेच अभियांत्रिकी पदवीधरांनीही शिपाई पदासाठी अर्ज केल्याने बदलता रोजगार दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. खासगी क्षेत्रातील कंत्राटी पद्धत, मर्यादित वेतनवाढ, वाढते कामाचे तास आणि नोकरीतील अस्थिरता यामुळे तरुणांचा कल शासकीय सेवेकडे वाढल्याचे दिसून येते. नियमित वेतन, पदोन्नतीची संधी, निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा हे आकर्षणाचे महत्त्वाचे घटक ठरत आहेत.
तब्बल १२२१ उच्च पदवीधर मैदानात
ग्रामीण पोलिस भरती प्रक्रियेत १२२१ उच्च पदवीधर सहभागी झाले आहेत. त्यात बी.ई. (१५), बी.टेक (१२), एमबीए (१४), बी. फार्मा (९), एम.एस्सी. (२७), एलएलबी (२), एम.कॉम (४३), बी.एस्सी. अॅग्री (२५), बीबीए/बीसीएस (२०), एम.ए. (२), बी.एस्सी. (३६३), बी.कॉम (१३५) आणि बी.ए. (५५४) यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित उमेदवारांनी सहभाग नोंदविल्याने रोजगार बाजारातील स्पर्धेची तीव्रता अधोरेखित झाली आहे.
राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण पोलिस भरतीस राज्यभरातून प्रतिसाद मिळाला आहे. बुलढाणा (२४६), नाशिक (१३८), परभणी (१२३), वाशिम (४४), यवतमाळ (३४), अकोला (२९), अमरावती (२४), सोलापूर (१८), नंदुरबार (१४) यांसह विविध जिल्ह्यांतून एकूण २०६१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. महिला उमेदवारांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून ग्रामीण भरतीत १८ पदे महिलांसाठी राखीव आहेत. भरतीदरम्यान उमेदवारांसाठी निवास व भोजनाची माफक दरात व्यवस्था करण्यात आली आहे.
सायबर युगात तांत्रिक मनुष्यबळाची गरज
सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि डिजिटल तपास यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस दलाला तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळ आवश्यक ठरत आहे. संगणक, अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील उमेदवार डेटा विश्लेषण, सायबर ट्रॅकिंग आणि डिजिटल पुरावे संकलनात प्रभावी भूमिका बजावू शकतात. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांचा वाढता सहभाग हा पोलिस दलासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.






