सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत आठ पैकी चार गणात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये दिवे गणातून अमित भाऊसाहेब झेंडे, गराडे गणातून अर्चना ज्ञानेश्वर कटके, नीरा शिवतक्रार गणातून मोनिका स्वप्नील कांबळे तसेच कोळविहीरे गणातून स्मिता संतोष निगडे हे चौघेजण निवडून आले आहेत. तसेच बेलसर गणातून माणिक बाळासो निंबाळकर आणि वीर गणातून प्रवीण बाळासाहेब जगताप हे दोघे सदस्य शिवसेनेचे त्याचप्रमाणे भिवडी गणातून सायली मनोज शिंदे आणि माळशिरस गणातून माऊली यादव हे दोघे भाजपचे सदस्य निवडून आले आहेत.
पक्षीय बलाबल पाहता आठ पैकी चार सदस्य एकट्या राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्याकडे बहुमत आहे. पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत पाहता दिवे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित आहे. गराडे गणात सर्वसाधारण महिला, नीरा शिवतक्रार गणात अनुसूचित जाती स्त्री तर कोळविहीरे गणात सर्वसाधारण स्त्री याप्रमाणे आरक्षण आहे. बेलसर, माळशिरस आणि वीर गणात सर्वसाधारण साठी आरक्षित असून, भिवडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण आहे. दरम्यान सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव आहे. हा प्रवर्ग पंचायत समितीच्या दिवे गणात आरक्षित झालेला असून, याच गणातून राष्ट्रवादीचे अमित झेंडे निवडून आले आहेत. त्यामुळे अमित भाऊसाहेब झेंडे यांच्या सभापती पदाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपची युती होण्याची शक्यता.
पुरंदर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीकडे बहुमत असून, सभापती पद राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर शिवसेना आणि भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहेत. मात्र आगामी काळातील राजकीय समीकरणे पाहता राष्ट्रवादीला भाजपची गरज पडणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदरचे कॉंग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना बरोबर घेऊन सोमेश्वर साखर कारखाना, खरेदी विक्री संघ, नीरा बाजार समिती आणि पुणे जिल्हा बँक अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन केली आहे.
दरम्यान आता संजय जगताप भाजपमध्ये असले तरी पक्षीय भाग वगळता जगताप यांचे राष्ट्रवादी बरोबर राजकीय संबंध सलोख्याचे राहिले आहेत. काही दिवसात पुरंदर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती च्या निवडणुका येत आहेत. त्यानंतर काही कालावधीत खरेदी विक्री संघ, नीरा बाजार समिती, जिल्हा बँकेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी आणि पूर्वीचे कॉंग्रेस व आताचे भाजप यांची सत्ता आहे. तसेच पुढील काळात हेच समीकरण ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपची गरज पडणार आहे. त्या बदल्यात भाजपला उपसभापती पद मिळू शकते. तसेच भाजपचे दोन सदस्य असल्याने दोन्ही सदस्यांना उपसभापती पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळण्याची शक्यता आहे.
अमित झेंडे यांनी पूर्वीच्या निवडणुकीत हार पत्करली आहे. मात्र त्याच जिद्दीने सक्रीय राहून त्यांनी दिवे गावचे सरपंच म्हणून काम केले आहे. त्यांच्या भावजई रुपाली अमोल झेंडे याही जिल्हा परिषद निवडणुकीत दिवे गराडे गटातून विजयी झाल्या आहेत. तसेच अमित झेंडे यांची संयमी, अभ्यासक आणि पक्षासाठी झोकून देवून काम करणारा कार्यकर्ता अशी ओळख असून युवकांचा मोठा संच आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला पक्ष वाढीसाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. तसेच आगामी निवडणुकांचा दृष्टीनेही अमित झेंडे यांच्या सभापतीपदाच्या निवडीला महत्व दिले जात आहे.






