जळगाव : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. महिलांवर केलेल्या भाष्यामुळे इंदुरीकर महाराज वादात अडकले होते. आता आपल्या कीर्तनात आमदारकीबाबत भाष्य केल्याने पुन्हा चर्चेत आले आहे. महाराष्ट्रात आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज लागतात. त्याशिवाय आमदारकी मिळविणे अवघड असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले.
आमदार व्हायचे असेल तर तुमच्याकडे एक-दोन साखर कारखाने, पाच-सहा कॉलेज, 100 ते 200 पतसंस्था, 100-150 महिला बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा कुठे आमदार होता येते. मात्र, याला काही जण अपवाद असतात.
राजकारणाने गाठली खालची पातळी
इंदुरीकर महाराज म्हणाले की, आता कोणासाठी कोणताही पक्ष राहिला नाही. कोण कोणत्या पक्षात काम करतो, हे कोणालाच समजत नाही. राजकारणाने खालची पातळी गाठली आहे. पक्ष कोणताही असू द्या मात्र, आपली माणसं आपल्याला सांभाळायची आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. पेरलेले पीक उगवेल की नाही, याची शाश्वती नाही.
15 दिवसांपासून हवामान खातेही पावसाची बातमी देईना झाले. आता माणूस कापसाकडे पाहतो आणि कापसाचे झाड माणसाकडे पाहते, अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांनी शेळ्या विकून सोयाबीन आणि कापसाच्या पिकांची लागणी केली. पण, आता पाऊस नसल्याने संकट निर्माण झाले आहे. सरकारही याची दखल घ्यायला तयार नाही.






