'...तर आम्ही राजीनामा द्यायला तयार'; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. विधानसभेत विरोध पक्षनेता ठरवता येईल इतकी संख्याही गाठता आलेली नाही. दरम्यान निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर आक्षेप घेतला असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यातच मारकडवाडी गावाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मारकडवाडी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.
‘बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असाल तर उत्तमराव जानकर यांच्यासह मी आणि खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत’, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिल्यानंतर काही लोक मारकडवाडीत आले आणि राजीनामे द्यावेत म्हणून बडबडून गेले आहेत. निवडणूक आयोगही त्यांचीच कठपुतली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सांगावं की पुढच्या निवडणुका बॅलेटवर घेऊ. आयोगाने असं जाहीर केलं तर मग उत्तमराव जानकर यांच्यासह मी आणि आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत. बॅलेटपेवर निवडणुका झाल्या पाहिजेत. मी स्वत: एक लाख मताधिक्यांनी निवडून आलो असतो. मात्र माझं मतदान २०८ वर आणून ठेवलं आहे, असा आरोप करत हा प्रकार आम्हालाही कळायला तयार नाही. तुमची परिस्थिती जशी आहे तशी आमचीही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाकडे एक व्यवस्था आहे. मग कुठे-कुठे मतदान झालं, त्याचे फुटेज आम्हाला देण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप आम्हाला निवडणूक आयोगाने कोणतेही फुटेज दिलेलं नाही. आता अजूनही भाजपवाले चिमटे घेऊन पाहतात की खरंच निवडून आलो का? त्यावर त्यांचाही विश्वास नाही. आता लोकांच्या मनात शंका आहेत. आपण दिलेलं मत समजून घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली. त्यानंतर जनतेने आवाज उचलला. हा आवाज कोणत्याही राजकीय पक्षाने उचललेला नाही.
दरम्यान मारकडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी पुढे आलेसल्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे तातडीने मागे घेतले पाहिजेत, ही मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. तसंच प्रशासनाच्या माध्यमातून जे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. तो प्रकार तातडीने थांबवला पाहिजे. अन्यथा याचे परिणाम पुढच्या काळात वाईट होतील, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.