Sanjay Raut News: 'जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?' सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर संजय राऊतांची जहरी टीका
Sanjay Raut News: “सचिन अहिर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. शरद पवार यांनी त्यांना मंत्रीपद, म्हाडाचे अध्यक्षपद, मुंबई अध्यक्षपद अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यांनंतरही ते शरद पवार यांना सोडून शिवसेनेत आले, त्यामुळे “जे शरद पवार यांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होतील,” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला आहे.
सचिन अहिर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. “सचिन अहिर यांनी हा निर्णय राजकीय भविष्यासाठी घेतल्याचे म्हटले, तर शिवसेना आता अशा धक्क्यांमुळे खचणारी राहिलेली नाही. शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असलेली संघटना असून गेल्या काही वर्षांत पक्ष ‘धक्का-प्रूफ’ झाला आहे. त्यामुळे एखादा नेता पक्ष सोडून गेला म्हणून पक्षाला धक्का बसत नाही.”
सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सहकारी होते. त्यांना पक्षात कोणी भेटत नव्हते किंवा त्यांचे कोणी ऐकत नव्हते, असा दावा ते करू शकत नाहीत. ते नियमितपणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेत होते. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी काही सहकाऱ्यांना संदेश पाठवून “पक्ष सोडणे ही माझी अपरिहार्यता असून माझ्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हा निर्णय घेत आहे,” असे सांगितल्याचेही राऊत यांनी नमूद केले.
“सचिन अहिर हे मूळचे शिवसैनिक नव्हते. त्यामुळे अशा घटनांनंतर पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पक्षाची खरी ताकद ही निष्ठावंत आणि मूळ शिवसैनिकांमध्येच असते. इतर अनेक जण परिस्थितीनुसार येतात आणि जातात,” अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
राजकीय भविष्यासाठी आपण शिंदे गटात गेल्याचे सचिन अहिर सांगत असले तरी त्यांचा राजकीय पराभव यापूर्वीच झाला होता. आदित्य ठाकरे यांनी त्यांना पुन्हा राजकीय संधी दिली. त्यांना विधान परिषदेवर आमदार केले, उपनेतेपद दिले, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्षपद दिले, पुणे जिल्ह्याची जबाबदारीही सोपवली. एवढे सर्व मिळाल्यानंतरही त्यांनी ठाकरे कुटुंब आणि शिवसैनिकांना अंधारात ठेवून पक्ष सोडणे योग्य नाही,”अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना भविष्यात काही पदे किंवा उमेदवारी मिळू शकते. तो त्यांचा राजकीय प्रवास असला तरी त्या प्रवासातील अनेक टप्पे इतिहासात त्यांच्या नावावर कलंक म्हणून नोंदवले जातील, अशी टीकाही राऊत यांनी केली.
“पदाशिवाय राहता येत नसेल, तर ती लालसा शेवटी राजकीय कारकिर्दीचा अंत करू शकते,” असा इशाराही त्यांनी दिला. सचिन अहिर गेल्याचे वाईट वाटते, कारण ते सहकारी होते. मात्र त्यांना पक्षात मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि पद सर्व काही मिळाले होते. तरीही त्यांनी पक्ष सोडला, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधताना राऊत म्हणाले की, आज त्यांच्या हातात सत्ता, पैसा आणि दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्यामुळे ते नेत्यांना पक्षात आणू शकतात. मात्र कोणत्याही पदाचा किंवा पैशाचा मोह नसलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना फोडून दाखवा, मग त्याचा आनंद साजरा करा, असे आव्हान त्यांनी दिले.






