'मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मसूर : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारावी, मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली चूक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारावी, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, अशीच सरकारची भूमिका दिसत आहे. मराठ्यांना फसवण्याचे राजकारण केले तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. आरक्षण लढ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आता जागा झाला आहे, असे स्पष्ट करत २९ ऑगस्टला अंतरवालीत धडक देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आगमनानंतर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. “आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. सरकारवर तीन वर्षे विश्वास ठेवला; एवढा संयम आता पुरे झाला. कोणत्याही पक्षात असा, पण आरक्षणाच्या प्रश्नावर पक्ष पाहू नका. समाजाच्या लेकरांवर अन्याय होत असेल तर पक्षापेक्षा समाज मोठा आहे,” असे सांगत त्यांनी मराठा समाजाला निर्णायक लढ्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.
“गेल्या तीन वर्षांत मी तुमची मान खाली जाऊ दिली नाही. सरकारने टाकलेला प्रत्येक डाव तुमच्यासमोर उघडपणे सांगितला. सरकारला सरळ ५८ लाख नोंदी मराठ्यांना द्यायच्या नाहीत. कारण त्या नोंदींच्या आधारे मराठ्यांना पिढ्यानपिढ्या टिकणारे आरक्षण मिळू शकते, याची सरकारला भीती आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“एसबीसी आरक्षण दिले, ते न्यायालयात टिकले नाही. एसीबीसी दिले, तेही टिकले नाही. ईडब्ल्यूएस देणार आणि तेही संपणार. मग पक्के आरक्षण कोणते, याचा शोध आपण घेतला. आपल्या बापजाद्यांच्या शेकडो वर्षांच्या नोंदी आपण शोधून काढल्या. सातारा संस्थानासह विविध संस्थानांच्या गॅझेटमध्ये असलेल्या नोंदी मराठ्यांच्या आरक्षणाचा मजबूत आधार आहेत,”
…मग मराठ्यांना आरक्षण देण्यास काय अडचण?
“आम्ही कोणाचेही आरक्षण काढून मराठ्यांना द्या, असे म्हणत नाही. ओबीसींच्या हक्कातील अर्धा टक्काही आम्हाला नको. आमच्या पूर्वजांच्या ज्या नोंदी आहेत, त्या द्या, एवढीच आमची मागणी आहे. गॅझेटमध्ये नोंदी आहेत, शिंदे समितीने त्या शोधल्या आहेत. मग त्या नोंदींच्या आधारे मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकारने काय अडचण आहे?” असा सवाल त्यांनी केला.
कुणबी प्रमाणपत्रांवरून सरकारवर निशाणा साधताना जरांगे म्हणाले, “दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी मोडी लिपीत आहेत. त्या वाचण्यासाठी सरकारला मोडी लिपीचे अभ्यासक शोधावे लागले. नोंदी सापडल्यानंतर शिंदे समितीने ग्रामपंचायतींकडे त्याची नोंद केली, फोटो काढले; तरीही प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत. गरीब मराठा मुलांनी कुणबी प्रमाणपत्रावर प्रवेश घेतला आहे. आता त्यांना आपले आरक्षण रद्द होईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. गरीब मराठा खचावा, हा सरकारचा डाव आहे.”
बावनकुळेंना सांगा सावध रहा..
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. “जरा थोडा दम धरा. मी वेळेची वाट पाहत आहे. वेळेवर घाव घालायचा हे मला चांगले माहिती आहे. थोडे आणखी पाप हातातून होऊ द्या; मग बघू काटा कसा काढायचा. “मराठी माणूस स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही. मात्र, चूक करणाऱ्याला सोडत नाही. ही मराठ्यांची भूमिका पूर्वीपासूनची आहे,”
“मी हट्ट सोडणार नाही. मी एखाद्याच्या मागे लागलो तर त्याचा बाजार उठवतो. गेल्या २५-३० वर्षांपासून मराठ्यांच्या विरोधात असलेल्या अनेकांना राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त केले आहे. हा बावनकुळे काहीच नाही; आत्ताशी सुरुवात झाली आहे. त्यांना सांगा, सावध राहा,” असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आमदार, खासदाराने सरकारला जाब विचारावा
मराठा समाजातील आमदार-खासदारांनाही त्यांनी खडेबोल सुनावले. “तुमच्या समाजाची लेकरं अडचणीत येत असतील, प्रमाणपत्रे रद्द होत असतील, शिक्षण आणि नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण होत असेल, तर तुम्ही पक्षाकडे किती काळ पाहणार? हा आता पक्षाचा प्रश्न राहिलेला नाही; हा जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मराठा आमदार-खासदारांनी स्वाभिमान दाखवून सरकारला जाब विचारला पाहिजे. अन्याय होत असताना पक्षाचे पाय चाटणे, गुलामासारखे वागणे हे मराठ्यांचे रक्त नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
सरकारवर तीन वर्षे विश्वास ठेवला
“पश्चिम महाराष्ट्र आता जागा झाला आहे. या भागातून निर्माण झालेली लाट संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढेल.” सरकारवर तीन वर्षे विश्वास ठेवला; आता एवढा बास झाला. संयम संपला आहे. “मी तुमच्या लेकरा-बाळांसाठी जीवाची बाजी लावून लढणार आहे. मरण आले तरी पत्करीन; पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार,”






