मलकापूर आगारात मध्यरात्री भीषण आग; अनेक कार्यालयीन वस्तू जळून खाक, 10 लाखांचं नुकसान (संग्रहित फोटो)
शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर एसटी आगारात गुरुवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आगारातील संगणक कक्षासह विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य, कार्यालयीन यंत्रसामग्री तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या दुर्घटनेत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मध्यरात्रीची वेळ असल्याने आग लागल्याचे लक्षात येताच आगार परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच संगणक कक्ष व कार्यालयीन साहित्याला आपल्या कवेत घेतले.
संगणक कक्षासह महत्वाचे साहित्य जळून खाक
या आगीत आगारातील प्रिंटर, पावती मशीन, पावती रोल, इंटरनेटसाठीची मशिनरी, वाय-फाय यंत्रणा, इन्व्हर्टर, बॅटरी तसेच संगणक व संगणकाशी संबंधित साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. दुसऱ्या मजल्यावरील संगणक कक्ष आणि कार्यालयीन साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आगाराच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तिकिटांच्या चिठ्ठया, पावतीसंबंधी साहित्य, कार्यालयीन कागदपत्रे तसेच विविध नोंदी आगीत जळून खाक झाल्याने आगार प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. महत्त्वाची यंत्रसामग्री आणि कागदपत्रे जळाल्यामुळे तिकीट व कार्यालयीन व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
विद्युत सुरक्षा ऐरणीवर
दरम्यान, आग लागण्यामागे शॉर्टसर्किट हे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे आगारातील विद्युत व्यवस्था, वायरिंग आणि कार्यालयीन यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आगारातील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे तसेच अग्निसुरक्षा यंत्रणेची सखोल तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जीवितहानी नाही
मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे मलकापूर आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीच्या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही समाधानाची बाब आहे. मात्र मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व कार्यालयीन साहित्य जळाल्याने आगाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.






