कुडाळमधील गुणगौरव सोहळा
कुडाळ : दहावी-बारावी परीक्षेचे निकाल लागले आहेत. कुडाळ तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावी, बारावी शाखानिहाय प्रथम ३ परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक आणि युवासेना कुडाळच्या वतीने महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले दैदिप्यमान यश कौतुकास्पद आहे. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी तुम्हाला प्रोत्साहन मिळावे म्हणूनच हा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पुढे ते म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात स्पर्धा आहे. स्पर्धात्मक युगात करिअरसाठी योग्य आणि आवडीचे क्षेत्र निवडा. त्या क्षेत्रासाठी तुम्ही चांगली वेळ दिली पाहिजे. आपण बघतले तर आवडीच्या क्षेत्रात करिअर करणारे अधिक यशस्वी होतात. त्यामुळे करिअरचे दडपण राहत नाही. मात्र, एखादे क्षेत्र निवडताना आपली क्षमता देखील तपासली पाहिजे असे प्रतिपादन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे केले.
यावेळी २२५ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, संतोष शिरसाट, प्रा. मंदार सावंत, स्नेहा दळवी, योगेश धुरी, गंगाराम सडवेलकर, संदेश प्रभू, सई काळप, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, उदय मांजरेकर, राजू गवंडे, बाबी गुरव, गोट्या चव्हाण, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, स्वप्निल शिंदे, दर्शन म्हाडगुत, नितीन सावंत, अजित परब यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक कुडाळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, आज पोलीस भरती सुरू आहे या पोलीस भरती तसेच नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीसाठी शिक्षक डॉक्टर बीएससी झालेली मुले सहभागी झाली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात कर्ज उपलब्ध असून मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी त्या शैक्षणिक कर्जाचा उपयोग करून घेतला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात ज्या काही अडचणी त्या सोडवण्यासाठी निश्चित आम्ही काम करू. दहावी बारावी पर्यंतच्या तुमच्या यशाबाबत मी मनापासून कौतुक करतो. यश मिळवतच रहाणे ही स्पर्धात्मक युगातील गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे यश हे अत्यंत उल्लेखनीय असल्याने त्यांच्या गुणगौरव सत्काराचा हा उपक्रम आम्ही गेली १० वर्षे आनंदाने राबवत आहोत. शैक्षणिक यश ही महत्वाची गरज आहे. आता प्रशालेच्या बोर्डवर तुमचे नाव ‘गुणवंत’ म्हणून लागले आहे. त्यामुळे तुमची यश प्राप्त करायची जबाबदारी आणखी वाढली आहे. यश मिळवण्याचे दडपण न घेता ते आपल्या चांगल्या भविष्यासाठी आहे त्यामुळे त्यासाठी आनंदाने परीश्रम करावेत. आपल्याला जीवनात केवळ बघ्याची भूमिका घ्यायची नाही तर विपरीत परिस्थितीमध्ये, सर्वांसाठी काहीतरी भरीव करायची वृत्ती आपल्यात सतत जागृत ठेवावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले की, दहावी बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश अभिनंदनास पात्र आहे. मुलांनी या यशात सातत्य ठेवावे. विशेष म्हणजे आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी करिअरच्या दिशेने ध्येय, उद्दिष्ट निश्चित करून मार्गक्रमण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, आपला सिंधुदूर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. दहावी बारावीच्या मुलांनी मिळवलेले यश निश्चितच सर्वांनाच कौतुकास्पद आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आमदार वैभव नाईक दरवर्षी गुणगौरव सोहळा आयोजित करतात. राज्यातील पुढच्या नवीन सरकारमध्ये आमदार वैभव नाईक सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील. तेव्हा ते सिंधुदुर्गच्या शिक्षण क्षेत्रावर आणखी लक्ष देतील. स्पर्धा परीक्षा केंद्र, विविध कॉलेजेस आणि अन्य आवश्यक सोयीसुविधा जिल्ह्यात आणतील. जेणेकरून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अजित परब यांनी केले तर सूत्रसंचालन बबन बोभाटे यांनी केले आहे.






