पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (फोटो- ट्विटर)
मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू आहे मुंबई क्लायमेट वीक
शाश्वत महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न सुरू – मुंडे
मुंबई: हवामान कृतीसाठी शासन, शहर संस्था आणि नागरिक यांची भागीदारी आवश्यक असून युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. समुदाय जनजागृती, हवामान साक्षरता आणि युवक उपक्रमांद्वारे शाश्वत महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाचे संचालक मार्टिन क्रुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध देशांतील प्रतिनिधी मुंबई क्लायमेट वीकच्या मंचावर एकत्र येत असून, जागतिक सहकार्य आणि व्यवहार्य भागीदारीतूनच हवामान कृती यशस्वी होईल. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे हीच आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. हवामान बदलाविरुद्धचा लढा आता केवळ चर्चेपुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगभरातील शहरांनी हवामान कृतीची जबाबदारी स्वीकारली असून, भारताकडून या जागतिक चळवळीत मुंबई क्लायमेट वीक हा ठोस आणि कृतीप्रधान वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“संपूर्ण जग एक कुटुंब आहे” ही आपल्या संस्कृतीची भावना हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. एका प्रदेशावर होणारा परिणाम अखेरीस सर्वांवर होतो. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसमोर उभे असलेले हवामान आव्हान गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. वाढते शहरी तापमान, अतिवृष्टी, पूरस्थिती, किनारपट्टीवरील ताण आणि वायू गुणवत्तेवरील दबाव या गंभीर बाबी आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातही अनपेक्षित दुष्काळ व पूर यांचा फटका बसत असून या पार्श्वभूमीवर मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना हा उपक्रम केवळ चर्चेसाठी नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वित्तपुरवठ्याच्या मार्गांना चालना देण्यासाठी आहे. सर्वांनी या मंचातील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून व्यवहार्य उपाय सुचवावेत, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे 'मुंबई क्लायमेट वीक'चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, 'मुंबई क्लायमेट… pic.twitter.com/BB6T3AYKKH — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 17, 2026
महाराष्ट्र औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या आघाडीवर असताना हवामान प्रतिकार शक्ती, आर्थिक विकास आणि सामाजिक समावेशन यांचा समन्वय असलेल्या हवामान संवेदनशील विकासाची दिशा स्वीकारत असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. ऊर्जा, नागरी विकास, पाणी आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून कृतीप्रधान धोरण राबवले जात आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमतेचा विस्तार, शहर नियोजनात हवामान जोखमींचा समावेश आणि विभागनिहाय शाश्वत नियोजन यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आव्हानांची व्याप्ती मोठी असल्याने अधिक मजबूत भागीदारी आणि नवोन्मेष आवश्यक असून हवामान-संवेदनशील नियोजन आणि प्रतिरोधक पायाभूत सुविधा ही राज्य आणि देशभर मानक पद्धत व्हावी, हा शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील शहरांसह ३० हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यापूर्वीच विविध देशांतील प्रतिनिधींशी केलेल्या संवादातून समान पर्यावरणीय चिंता आणि उपाययोजनांवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. हवामान कृती यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकाच दिशेने विचार करून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित पर्यावरण निर्माण करण्याचे सामूहिक ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जबाबदारीची जाणीव हीच भविष्य घडवते, असे सांगत पुढील दिवसांत ठोस निष्पत्ती, टिकाऊ भागीदारी आणि मोजता येण्याजोगी हवामान प्रगती साधण्याची अपेक्षा मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.






