(Photo - X)
मुंबई, दि. ३१ : भटके-विमुक्त समाजातील ५२ जातींच्या कला, संस्कृती, परंपरा आणि कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून मुंबईत भव्य राज्यस्तरीय महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भटके-विमुक्त समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांची देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना ओळख करून देण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दिलेल्या सूचनेनुसार पर्यटन विभागाकडून तातडीने कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबईतील सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात विमुक्त दिनानिमित्त आयोजित ‘शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषदेस’ मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय शिव भटके-विमुक्त (DNT) सेनेचे राष्ट्रीय नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी भटके-विमुक्त समाजातील विविध जातींची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच संकेतस्थळाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेनेचे मंत्री, खासदार, पदाधिकारी, मान्यवर तसेच हजारो समाजबांधव उपस्थित होते.
“महाराष्ट्रातील ५२ जाती-समाजांना एकत्र आणण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीची झलक आजच्या कार्यक्रमातून दिसली. या समाजांच्या कला आणि परंपरांना व्यासपीठ मिळवून देऊन देश-विदेशातील पर्यटकांना त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदयांनी पर्यटन विभागावर सोपविली आहे. त्यांच्या सूचनेनुसार, मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभाग या महोत्सवाच्या आयोजनासाठी तातडीने कार्यवाही करेल,” असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, नाथजोगी/भराडी, नंदीवाले, पाथरवट, वडार, डोंबारी-कोल्हाटी, छप्परबंद, गारुडी, लोहार-घिसाडी, माकडवाले-कैकाडी, भाट, भोई-कहार, चित्रकथी, बेलदार, बंजारा, मलणजोगी, ओतारी, गोसावी, गोंधळी आदी विविध भटके-विमुक्त समाजांच्या कला व परंपरांना या महोत्सवातून स्थान देण्यात येणार आहे. त्यांच्या लोककला, पारंपरिक व्यवसाय, जीवनशैली आणि सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण पर्यटकांसमोर करण्याचा पर्यटन विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
भटके-विमुक्त समाजाच्या हक्क, न्याय आणि विकासासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.






