आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
Nashik Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत काँग्रेसने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नाशिकमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. नाशिक विभागात आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या असल्याने सरकारने याच ठिकाणी निर्णय घ्यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“आदिवासी विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी १५-२० दिवसापासून उपोषण करत आहेत पण भाजपा महायुती सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपा महायुतीचे सरकार खडबडून जागे झाले व घाईघाईत मागण्या मान्य केल्याचे सांगत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, त्यांचे आश्वासन म्हणजे लबाडा घरचे जेवण आहे. नाशिक विभागात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे म्हणून नाशिकमध्ये मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर कराव्यात,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सपकाळ पुढे म्हणाले की, “आदिवासी विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे, आदिवासींच्या योजनेतील पैसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. मागील दोन वर्षात ८९२ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, याला फडणवीस सरकार जबाबदार आहे. या विभागातील अनागोंदी कारभार पाहता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घेतला पाहिजे.”
“भाजपा सरकारने बिंदू नामावलीमध्ये खोडसाळपणा करून आठव्या नंबरवर टाकण्यात आले आहे. जे अन्न मिळते त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे तो सुधारावा, सेंट्रल किचन तातडीने बंद करावे. अशा त्यांच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करा. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी २ तारखेला नाशिक दौऱ्यावर येत आहेत म्हणून भाजपा सरकार घाईघाईने विद्यार्थ्यांना मागण्या मान्य असल्याचे सांगत आहेत पण त्यावर विश्वास ठेवता येणार नाही,” असेही सपकाळ म्हणाले.
“राहुल गांधी यांनी पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. नाशिक प्रमाणेच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व राज्यातील इतर ठिकाणीही हे आंदोलन सुरू आहे, या ठिकाणच्या प्रतिनिधींची भेट घेण्याचा आमचा मानस आहे. काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला व मोर्चालाही पाठिंबा आहे,” असेही सपकाळ म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज अभियानावर आरोप केले, त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “खोटं बोल पण रेटून बोल, ही भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांची शैली आहे, त्यांना खोटं बोलण्याचा आजार झाला आहे. म्हणून त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही पण छात्रों की गुंज अभियानामुळे त्यांची झोप उडालेली आहे हे मात्र स्पष्ट दिसत आहे,” असे सपकाळ म्हणाले.






