युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी
मुंबई : तरुण पिढीला पर्यटनाशी जोडणे आणि पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे युवा पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. राज्यभरातील अधिकाधिक तरुणांनी सदर धोरणाचा लाभ घ्यावा आणि त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले आहे.
तरुणांमध्ये पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि जबाबदार पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळ’ स्थापन करण्यात आली आहेत. तसेच युवा पर्यटन मंडळाद्वारे ‘युवा पर्यटन राजदूत’ घडविण्यास मदत होत आहे.
युवा पर्यटन धोरणाअंतर्गत राज्यातील मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालयांमध्ये इयत्ता सातवी आणि त्यापुढील वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळे स्थापन करण्यात येत आहेत. या मंडळांचा उद्देश देशातील पर्यटन, समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती असलेले तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या पर्यटनाचा प्रभावी प्रचार व प्रसार करू शकणारे युवा पर्यटन राजदूत घडविणे हा आहे.
या युवा पर्यटन मंडळांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तरुणांमध्ये एकत्रित काम, व्यवस्थापन, नेतृत्व आणि सेवा यांसारखी महत्त्वाची कौशल्ये विकसित होण्यास मदत मिळणार आहे. तरुणांमध्ये जबाबदार व शाश्वत पर्यटनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सदर धोरण महत्त्वपूर्ण ठरत आहे.
याशिवाय, केंद्र शासनाने युवा पर्यटन मंडळांसाठी एक मार्गदर्शिका तयार केली आहे. यामध्ये युवा मंडळाची संकल्पना, उद्दिष्टे, उपक्रम, संघटनात्मक रचना, सदस्यांची भूमिका, जबाबदाऱ्या तसेच इतर आवश्यक मार्गदर्शक सूचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. युवा पर्यटन मंडळाच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देणे, त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी योगदान देणे, तसेच पर्यटन स्थळांवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित आहे.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.)म्हणाले, “राज्याला पर्यटन क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन विविध स्तरांवर सातत्याने काम करत आहे. युवा पर्यटन धोरण हे याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. तरुणांसह लहान वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी हे धोरण राबविण्यात आले आहे. राज्यातील अधिकाधिक शाळा आणि महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभागी होऊन युवा पर्यटन मंडळे स्थापन करावीत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आमचे आवाहन आहे.”






