(फोटो सौजन्य: Pinterest)
मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन २३८ नवीन उपनगरीय लोकल गाड्यांची निर्मिती सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार असून गाडी सुरू असताना दरवाजे बंद राहतील, अशी यंत्रणा असणार आहे. त्यामुळे दरवाजात उभे राहून प्रवास करणे आणि पडण्याच्या घटना कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय या गाड्यांमध्ये सुधारित वायुवीजन व्यवस्था, आधुनिक ब्रेक प्रणाली तसेच प्रवाशांच्या सोयीच्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. तसेच मुंबई, पुण्यासह देशातील ४८ शहरांमध्ये रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी विविध कामे सुरू असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये नवीन फलाट, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स, कोचिंग टर्मिनल्स आणि देखभाल सुविधा उभारल्या जात आहेत. या कामांमुळे भविष्यात अधिक गाड्या चालवणे शक्य होणार असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे.
स्थानकांचे आधुनिकीकरण सुरूच
देशभरातील १३०० रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू असून त्यापैकी १८० स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, तर सुमारे ५०० स्थानके अंतिम टप्प्यात आहेत. या कामांतर्गत प्रवाशांसाठी आधुनिक प्रतीक्षालय, एस्कलेटर, लिफ्ट, स्वच्छता सुविधा आणि डिजिटल माहिती प्रणाली विकसित केल्या जात आहेत, तसेच ७५ स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी थांबू शकतील असे आधुनिक ‘होल्डिंग एरिया’ उभारले जात आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई-पुणे आणखी जवळ येणार
मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली. तसेच पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या दोन शहरांमधील प्रवास सुमारे दोन तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे काम सुरू असून एकूण २१ किलोमीटर लांबीच्या सात बोगद्यांपैकी सुमारे ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही टप्प्याटप्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वेची तयारी
आगामी नाशिक कुंभमेळा लक्षात घेऊन रेल्वेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन १७ रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि १९ भुयारी मार्गांची कामे सुरू आहेत. यामुळे कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






