शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, उपमहापौर संजय घाडी, बालकल्याण समितीच्या मिनल तुर्डे आणि किरण लांडगे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २ जुलै २०२६ रोजी साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात मॅनहोलच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना असलम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वीही के/पश्चिम विभागात मान्सूनपूर्व पाहणीदरम्यान तुटलेल्या मॅनहोलच्या झाकणामुळे पालिकेच्याच कर्मचाऱ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर १५ जून २०२६ रोजी शहरातील विशेषतः शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि पाणी साचणाऱ्या भागांतील मॅनहोलचे सर्वेक्षण करून सुरक्षित संरक्षक जाळ्या बसविण्याबाबत प्रशासनाला लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळल्यामुळे चार विद्यार्थी जखमी झाले आणि ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. धोकादायक झाडांची वेळेत छाटणी व नियमित पाहणी करण्यात झालेल्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या दोन्ही घटना प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
माझा प्रभाग माझी जबाबदारी, सर्व झाडांचं ऑडिट सुरू, नगरसेविका संध्या दोशी यांनी दिली माहिती






