
कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज
मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली परिसरात कमाल तापमान साधारण ३२ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. अहमदनगर येथे किमान तापमान सुमारे १३.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने पहाटे गारवा जाणवत आहे. सोलापूर, लोणावळा-लोणगाव परिसरातही दिवसाचे तापमान वाढत असले तरी रात्रीची थंडी कायम आहे, तर कोकण पट्टयात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या आसपास असून किमान तापमान १९ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
विदर्भात उष्णतेचा चढता आलेख दिसत असून अमरावती येथे कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. अकोला, वर्धा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर भागातही ३४ ते ३५ अंशांच्या आसपास तापमान नोंदले गेले आहे, मात्र किमान तापमान १६ ते १८ अंशांच्या दरम्यान असल्याने रात्रीची थंडी अजून कायम आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून, किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे राज्यात उन्हाच्या झळा पूर्णपणे जाणवायला अजून काही काळ लागणार असून, तोपर्यंत उन्हाची तिरिप सहनीयच राहणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असले, तरी किमान तापमान १३ ते १८ अंशांदरम्यान टिकून आहे. हाच घटक सध्या गारवा राखण्यास निर्णायक ठरत आहे. किमान तापमान कमी असल्याने रात्री व पहाटे थंडावा जाणवतो. किमान तापमानात मोठी वाढ झाल्यासव उकाडा व कडक उन्हाची झळ तीव्रतेने जाणवू लागते. म्हणूनच, सध्या राज्यात उन्हाची तिरिप सहनीय राहण्यामागे किमान तापमानाचा मुख्य रोल’ असल्याचे हवामान तज्ज्ञ स्पष्ट करतात.