
शेतकरी चिंतेत! उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा ४० वरून ३५ अंशावर
होळीनंतर उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावल्याने पारा ३२ अंशांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट आली आणि तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला होता. सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत होता. विशेषतः पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांचे उकाड्याने प्रचंड हाल होत होते. आता आकाशात काळे ढग दाटून आल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असून रविवारी पारा ३५ अंशांपर्यंत खाली आला आहे.
Nanded News : महिला आरक्षण गेलं खड्डयात..; भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ना खंत ना खेद
हवामानातील हा लपंडाव सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला, तरी बळीराजासाठी मात्र चिंतेची बाब ठरत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पाऊस आणि आता ढगाळ वातावरण, अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आंबा आणि डाळिंब बागांना या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसू शकतो. मोहोर गळणे किवा फळावर डाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कांदा आणि गहू काढणीच्या हंगामात असतानाच हवामान बदलल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, रविवार, १९ ते २१ एप्रिल दरम्यान किनारपट्टीवरील महाराष्ट्रात, म्हणजेच कोकण प्रदेशात, हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या काळात मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या काळात किनारपट्टीवरील रहिवासी आणि मच्छिमारांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे समुद्रातील हालचालींवर परिणाम होऊ शकतो.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशात २३ एप्रिलपर्यंत अधूनमधून पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचे वारे सुरू राहण्याची शक्यता आहे. या भागांतील हवामानात सतत बदल होत राहतील, ज्यामुळे सामान्य जीवन आणि शेती या दोन्हींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.