पुणे : शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. यापूर्वी भ्रष्टाचारावर भाजप राष्ट्रवादीला धारेवर धरत असत. मात्र आता भाजप आरोप करत नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. बारामतीतील निवावी व्हायरल पत्रावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्यावर आधी प्रहार फक्त भ्रष्टाचारावर व्हायचा. आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालेले आहोत. मात्र आता आमच्यावर कोणतेही आरोप होत नाही. मात्र घराणेशाहीचा आरोप होतो आहे. तो आरोप मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा भाजप सोबत होते, तेव्हा त्यांना चालत होते. मग आता असे का?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर निनावी पत्रावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “या पत्राबद्दल मला काही माहिती नाही. मात्र आम्ही पवार कुटुंब एकत्र आहोत. जे जे निर्णय होतात ते सर्वानुमते घेतली जातात. आमच्याकडे कोणाला काय शिक्षण द्यायचे हे देखील चर्चा करुन निर्णय होतात. काही वेळा एखादे पाऊल मागे घ्यावे लागते,” असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
तसेच खासदार सुळे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपानंतर त्यांच्या झालेल्या पक्षप्रवेशावर टीका केली. “अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. हा आरोप संसदेत ऑन रेकॉर्ड केला होता. मी माझ्या कानांनी ऐकला डोळ्यांनी पाहिला आहे. यामुळे भ्रष्टाचारी कोण आहे हे देशातील जनतेला माहित आहे. माझी लढाई या दिल्लीच्या तक्ताविरोधात आहे की जो महाराष्ट्राचा विरोध करतो. देशाचे पंतप्रधान शरद पवारांवर टीका करत असतील तर ही लोकशाही आहे. यात गैर काय? याच भाजपने शरद पवारांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. मी भाजप सरकारचे आभार मानते,” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.