धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव
ठाणेहून जव्हारकडे निघालेली एसटी बस वाडा-भिवंडी महामार्गावरील नेहरोली परिसरात पोहोचली असताना अचानक बसचे मागील एक चाक निखळून रस्त्यावर पडले. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला चालक आणि वाहक यांच्या ही घटना लक्षात आली नाही. त्यामुळे बस सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत एका मागील चाकावरच पुढे जात राहिली. याचदरम्यान बसचा दुसरा मागील टायरही फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.
दुसरा टायर फुटल्यानंतर बसवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला.
या एसटी बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांचा समावेश होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या वाहन देखभाल आणि तांत्रिक तपासणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमित तपासणी होत असताना धावत्या बसचे चाक कसे निखळले, याची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वेळेवर चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते, तर ही घटना मोठ्या दुर्घटनेत बदलली असती, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.






