पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी कपात (फोटो- सोशल मीडिया)
पवना आणि आंद्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी
मान्सूनचे आगमनही लांबले
पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय
पिंपरी: पवना आणि आंद्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असतानाच, यंदा मान्सूनचे आगमनही लांबले आहे. याचा थेट फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला असून, पाणीपुरवठा नियोजनबद्ध आणि संतुलित करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, उद्यापासून (रविवार, ता. २८) शहरात पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या नव्या नियोजनानुसार शहरातील विविध भागांना किमान एक तास ते कमाल तीन तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.
महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाऊस लांबल्यामुळे उपलब्ध जलसाठ्यावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली असल्याने, शहरातील अनेक भागांत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊन क्षेत्रनिहाय वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले असून, ते नागरिकांसाठी प्रसिद्ध केले जाणार आहे.
काही भागांत पाणीपुरवठ्याची वेळ वाढणार
नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ वाढणार असून, काही भागांमध्ये केवळ वेळेत बदल होणार आहे.
“शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांवर ताण वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे आणि पाणी बचतीच्या उपक्रमांना सहकार्य करावे. मोठी वाणिज्यिक संकुले, गृहनिर्माण संस्था व नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र वेळापत्रक: सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या भागांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित.
उद्यापासून (२८ जून) लागू: रविवारपासून शहरात नव्या वेळापत्रकानुसार पाणी वितरण होणार.
१ ते ३ तास पुरवठा: भागाच्या रचनेनुसार किमान एक तास, तर कमाल तीन तास पाणी मिळणार.
नागरिकांना आवाहन: नागरिकांनी आपल्या भागातील पाणी येण्याची वेळ तपासून घेऊन पाण्याचा पुरेसा साठा करावा.






