
पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन; म्हणाले...
चव्हाण म्हणाले, काँग्रेसचा विचार हा शाहू–फुले–आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आधारित आहे. काँग्रेसने सत्तेत असताना जनहितासाठी काम करत अनेक लोकोपयोगी संस्था उभारल्या व योजना राबवल्या. मात्र आज राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, लाखो तरुण बेरोजगार आहेत, ही गंभीर परिस्थिती असून, सत्ताधाऱ्यांना त्याचे देणेघेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.
जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि लोकोपयोगी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची आज नितांत गरज आहे. नामदेव पाटील यांच्याकडे ही जाणीव आहे, असे चव्हाण म्हणाले. अजितराव पाटील-चिखलीकर यांनी, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्याला शिस्त लागली व महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला होता, अशी आठवण करून दिली.
कार्यक्रमास सत्वशीला चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत चव्हाण, उत्तमराव पाटील, ॲड. अमित जाधव, अल्ताफ शिकलगार, वैशाली जाधव, अमृता पाटील, वहिदा शेख आदी उपस्थित होते. प्राचार्य अन्वर मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. विजय माने व शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले.
बांधकाम कामगारांचा निधी मतांसाठी
नामदेव पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात विकासनिधी पोहोचला आहे. पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रतिमेला साजेसे काम केले. भाजपा सरकारने बांधकाम कामगार कल्याण खात्याचा निधी मतांसाठी वापरला, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मध्यान्ह भोजन योजना बंद करून भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली, त्यामुळे मूळ लाभार्थी कामगार योजनांपासून वंचित राहिले, अशी टीकाही त्यांनी केली. शेतीमालाला हमीभाव व खतांवर सबसिडी देण्याची मागणीही त्यांनी मांडली.
उपमुख्यमंत्र्यांच्या गावात ड्रग्जचा कारखाना
उपमुख्यमंत्र्यांच्या गावात ड्रग्जचा कारखाना सापडतो, त्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवाल उपस्थित करत चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. राज्यावर दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले असून जनतेची कररूपाने लूट सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.