
पीएमपी आहे नागरिकांची जीवनवाहिनी
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संथ गती पीएमपीचा कारभार
पीएमपीमध्ये एकूण तीन विभागांत कर्मचाऱ्यांची विभागणी
चंद्रकांत कांबळे/पुणे: पुणे,पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) गाडा सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संथ गतीने चालला आहे. सन २०१३ च्या आस्थापना आराखड्यानुसार पीएमपीमध्ये १५ हजार ५१९ पदांना मान्यता देण्यात आली होती .मात्र,सध्या (Pune) अवघ्या ७ हजार ४६८ कर्मचाऱ्यांच्या बळावर या जीवनवाहिनीचा रथ सुरू आहे.सद्यस्थितीत तब्बल ८ हजार ५१ पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून,पीएमपीमध्ये नवीन काही बदल किंवा सुधारणा करायची म्हटल्यास मनुष्यबळाची मोठी अडचण येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
पीएमपीमध्ये एकूण तीन विभागांत कर्मचाऱ्यांची विभागणी करण्यात आलेली आहे.त्यात अॅडमिन (प्रशासन) विभागात लिपिक,सुरक्षा रक्षक,झाडूवाला,शिपाई अशा एकूण १०० प्रकारच्या पदांचा समावेश आहे.वर्कशॉप (कार्यशाळा) विभागात क्लिनर,फोरमन,हेल्पर,इंजिनिअर यांचा समावेश असून,एकूण ४९ प्रकारची पदे आहेत.शिवाय वाहतूक विभाग यामध्ये वाहक,चालक,चेकर,डेपो मॅनेजर अशा ३८ प्रकारच्या पदांचा समावेश आहे.
२०१३ च्या आस्थापना आराखड्यानुसार सद्यस्थिती
विभाग मान्यताप्राप्त जागा रिक्त जागा भरलेल्या जागा
अॅडमिन विभाग १,७९५ १,१३५ ६६०
वर्कशॉप विभाग २,९०२ २,१३३ ७६९
वाहतूक विभाग १०,८२२ ४,७८३ ६,०३९
एकूण संख्या १५,५१९ ८,०५१ ७,४६८
पीएमपीमध्ये शेवटची भरती कधी झाली?
पीएमपीमध्ये शेवटची भरती सन २०१७-१८ मध्ये वाहक,चालक,क्लिनर आणि वर्कशॉप विभागासाठी झाली होती.
भरती प्रक्रिया
पीएमपीची भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून सरळसेवेतून आणि अनुकंपा तत्त्वावर केली जाते.
Pune PMPML News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल
अनुकंपा प्रक्रिया आणि सद्यस्थिती
पीएमपीच्या अ,ब,क,ड यांपैकी कोणत्याही संवर्गातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास, त्यांच्या वारसांना ‘वाहक’ (कंडक्टर) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. ५ फेब्रुवारी २०२१ ते ९ जून २०२६ या कालावधीत अनुकंपेसाठी एकूण १७७ अर्ज आलेले आहेत. यातील ९० जणांना नियुक्ती देण्यात आली असून, २८ जणांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.उर्वरित ५९ जणांपैकी २२ जण अपात्र ठरले आहेत, तर १९ जणांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.तसेच १५ जणांचे वय १८ वर्षे पूर्ण नसल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत आणि ३ जण सध्या वाहक म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.