
पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा
रांजणी : राज्यात पावसाने यावर्षी ओढ दिल्यानंतर धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा 14.30 टक्के शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 31.16 टक्के होता. त्यामुळे साहजिकच यंदा वळीवाचा पाऊस न पडल्याने धरणातील पाणीसाठा पूर्णतः कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. आगामी काळात पाण्याची बचत केली गेली नाही तर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे हाल होणार हे निश्चित आहे.
जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार, यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे अनेक भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. राज्यात एकूण 3028 धरणे आणि बंधारे असून, या जलाशयांमध्ये गुरुवारी एकूण जिवंत पाणीसाठा 24.3 टक्के आहे तर गेल्या वर्षी 18 जून 2025 रोजी हा पाणीसाठा 32.38 टक्के इतका नोंदविला गेला होता. जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी यांनी सांगितले की, पाणीसाठ्याची ही आकडेवारी काहीशी दिशाभूल करणारी असू शकते. कारण 2025 मध्ये नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर म्हणजेच 28 मे रोजीच दाखल झाला होता. तसेच जूनच्या मध्यापर्यंत किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला होता.
Bhima Koregaon Case प्रकरणी एनआयएकडून तीन जणांची चौकशी; मुंबई प्रेस क्लबच्या माजी सदस्यांना समन्स
यंदा राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही, त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. या पाणीटंचाईचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. पाणी वाचवण्याच्या अनेक योजना राबवायला प्रारंभ झाला असून, शेतकऱ्यांनी सांगितल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.
मृत पाणीसाठा म्हणजे काय?
प्रत्येक धरणात काही प्रमाणात पाण्याचा साठा असतो, ज्याला मृत साठा मानले जाते. हा साठा साधारणपणे कोणत्याही कारणासाठी वापरला जात नाही. या मृतसाठ्यावर जमा होणाऱ्या पाण्याला जिवंत पाणीसाठा म्हणून मानले जाते. पुणे विभागात सध्या 77.2 अब्ज घनफूट जिवंत पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
पाच धरणातील पाण्याची पातळी खूपच कमी
पुणे जिल्ह्यातील पाणीसाठ्याचा विचार केला तर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या कुकडी प्रकल्पात देखील यंदा खूपच पाण्याची टंचाई भासत आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत डिंभे, माणिकडोह, येडगाव, वडज आणि पिंपळगाव जोगा या पाच धरणांचा समावेश होतो. या पाच धरणातील पाण्याची पातळी खूपच कमी झाली असून, या आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.