
पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी
या प्रकल्पासाठी आमदार शिवतारे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सासवड येथील पालखीतळ मैदानावर झालेल्या कार्यक्रमात जाहीर सभेत तसेच लेखी स्वरूपात मागणी केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी नीरा नदीमार्गे पुढे वाहून जाते. या पाण्याचे योग्य नियोजन करून ते कऱ्हा नदीच्या परिसरात वळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, रोमनवाडी यांसारख्या दुष्काळी गावांसह बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील अनेक गावांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार
आमदार शिवतारे म्हणाले की, कऱ्हा नदी ही हंगामी स्वरूपाची असून ती केवळ तीन ते चार महिनेच प्रवाहित राहते. त्यामुळे उर्वरित काळात परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविल्यास सिंचनाबरोबरच या भागातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो.
हे सुद्धा वाचा : बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…
मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी – शिवतारे
सासवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यास मान्यता मिळूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मतदारसंघात ट्रॉमा सेंटर उभारणी संदर्भात तातडीने निर्णय व्हावा, फुरसुंगी येथे १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून, यावर सकारात्मक निर्णय व्हावा, तसेच पुणे शहर झपाट्याने विस्तारत असून आपल्या मतदारसंघालगत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ससूनच्या धर्तीवर पुरंदर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचा उल्लेख केला होता; मात्र अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. तरी याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अधिवेशनात केली आहे.