
पुणे शहरात जाणवू लागला कडक उन्हाळा
दोन दिवस पारा ३५ अंशांच्या पुढे
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव झाला कमी
पुणे: मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुणे शहर आणि परिसरात उन्हाचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्याने तापमानात सातत्याने वाढ होत असून सलग दोन दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाळ्याच्या झळा आतापासूनच जाणवत आहेत.
बुधवारी (ता. ४) शहरात १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने दुपारच्या सुमारास उकाड्यात अधिक भर पडली. दुपारी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. सकाळी वातावरणात किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (ता. ५) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारपासून (ता. ७) कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मार्चच्या प्रारंभीच तापमानाने घेतलेली ही झेप आगामी दिवसांत अधिक तीव्र उन्हाळ्याचे संकेत देत आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?
शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?
अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे. उन्हामुळे कुरणातील गवत लवकर वाळत आहे. हिरवा चारा कमी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना सुक्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटणे, जनावरांमध्ये अशक्तपणा, उष्माघाताचा धोका ही होण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत असून, पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतीसाठी पाणी सिंचनावर देखील मर्यादा पडण्याची शक्यता आहे.