
छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस
विभागी आयुक्तालयातून प्राप्त आकडेवारीनुसार, १ जूनपासून जिल्ह्यात केवळ १२. २ मिमी पाऊस झाला आहे. अंदाजे ७ जूनच्या आसपास मान्सून राज्यात प्रवेश करतो. मात्र यंदा यात उशीर होणार असल्याची शक्यता आहे. १ ते ८ जूनपर्यंत संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी ३३. ४ मिमी इतकी आहे. तर पडलेला पाऊस केवळ १२. २ मिमी इतका आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ३६. ५ टक्केच पाऊस झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना हे चिंतीत करणारे ठरू शकते. मान्सून आगमनानंतर पुढील दिवसात पावसाने जोरदार वृष्टी करणे गरजेचे असणार आहे.
पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जिल्ह्याची सरासरी ५८१. ७मिमी इतकी आहे. गेल्या आठ दिवसात यातील केवळ २. १ मिमी पर्यंत मजल पावसाने मारली आहे. पुढील दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह, सिंचन आणि उद्योगांवर होणार आहे. त्यामुळे विशेषक करून शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागून आहे.
मराठवाड्यातदेखील जिल्ह्यासोबतच पावसाने सरासरी गाठलेली नाही. प्राप्त आकडेवारीनुसार, १ ते ८ जूनदरम्यान विभागाची सरासरी ३५. ७ मिमी इतकी आहे. तर आजपर्यंत ३०. ४ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीच्या केवळ ८५.२ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची आतुरतेने प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी थांबल्याचे दिसत आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, १ जूनपासून जिल्ह्यात १२. २ मिमी पाऊस झाला आहे. या आठ दिवसात जिल्ह्याच्या बहुतेक सर्वच सर्कलमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली होती. मान्सूनच्या वाटचालीचा परिणाम म्हणून रविवारी जिल्ह्यात केवळ ०.२ मिमी पाऊस झाला आहे.
यंदा अल निनोच्या परिणामुळे कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास याचा फटका शेतीक्षेत्राला होणार आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हे त्रासदायक ठरू शकते. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्याची पूर्वतयारी पूर्ण करून ठेवली आहे. तर काहींनी मान्सूनपूर्व पावसाच्या भरवश्यावर पेरण्या सुरु केल्या आहेत. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच बियाणांच्या उगवणीसाठी हे फायदेशीर ठरते. यामुळे मान्सूनच्या पावसाच्या काही दिवसांनी पेरण्यांना सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले.