संग्रहित फोटो
दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचा आणि गारांचा जोर सर्वाधिक होता. यामध्ये प्रामुख्याने यवत, यवत स्टेशन, उंडवडी, खामगाव, खानोटे, पिलानवाडी, दहीटने आणि राहू या गावांचा समावेश आहे. या भागात कांदा, भाजीपाला, फळबागा आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे या आपत्तीमुळे कंबरडे मोडले आहे. तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरात लवकर तयार करून तो शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधितांना शासनाकडून योग्य ती मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार कुल यांनी सांगितले. दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष बाधितांच्या शेतात जाऊन पाहणी करणार असून, यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा : गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त
शिरूर पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाचा तडाखा
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास गारांसह झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. विशेषतः कवठे येमाई परिसरातील मुंजाळवाडी, ढगे माथा, येडे बोऱ्हाडे वस्ती आदी भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा व केळी यांसारखी उभी पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, महसूल व कृषी विभागाने तत्परता दाखवत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे शुक्रवारी (दि. २०) सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केले आहेत. सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी पहाटेच कवठे येमाई येथे दाखल होत येडे बोऱ्हाडे वस्ती, टावरे वस्ती, मुंजाळवाडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत पंचनाम्याला सुरुवात केली.






