तीनशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा अमृतेश्वर मंदिर समूह (फोटो- गायत्री)
अमृतेश्वर-सिद्धेश्वर मंदिर समूह पुण्यातील महत्त्वाचे स्थळ
या मंदिर समूहाचा ग्रेड-१ वारसा वास्तू म्हणून समावेश
चित्राव कुटुंबाशी जोडला जातो या परिसराच्या इतिहासाचा संबंध
पुणे/गायत्री पवळे: पुण्याच्या शनिवार पेठेतील आपटे घाटाजवळ, मुठा नदीच्या काठावर असलेला (Shiv Temples) अमृतेश्वर-सिद्धेश्वर मंदिर समूह पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातील महत्त्वाचे स्थळ आहे. पेशवेकालीन पुण्याच्या विस्तारासोबत विकसित झालेल्या या मंदिर समूहात विविध काळात उभारण्यात आलेली मंदिरे आजही एकत्र पाहायला मिळतात. पुणे महापालिकेच्या वारसा यादीत या मंदिर समूहाचा ग्रेड-१ वारसा वास्तू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या परिसराच्या इतिहासाचा संबंध चित्राव कुटुंबाशी जोडला जातो. उपलब्ध वास्तु-अभ्यासानुसार मंदिर समूहातील सिद्धेश्वर मंदिराची उभारणी इ.स. १७३८ मध्ये झाली. त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिराची भर पडली आणि इ.स. १७७८ मध्ये अमृतेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली. पुढील काळात हनुमान आणि विठ्ठल मंदिरांचाही या समूहात समावेश झाला. त्यामुळे हा परिसर केवळ एका मंदिरापुरता मर्यादित नसून मराठा-पेशवा काळातील धार्मिक वास्तुकलेचा एक महत्त्वाचा समूह मानला जातो.
अमृतेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून त्याची वास्तुरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात नंदी मंडप, अर्धमंडप, मुख्य मंडप आणि भूमिगत गर्भगृह अशी रचना असल्याचे वास्तु-अभ्यासात नमूद आहे. स्थानिक दगडाचा वापर आणि मराठा स्थापत्यशैलीसोबत नागर तसेच इतर स्थापत्य प्रभावांची सांगड या वास्तूत दिसून येते. भूमिगत गर्भगृह हे मंदिराचे विशेष आकर्षण मानले जाते.
मंदिर समूहातील लक्ष्मीनारायण मंदिराला मुठा नदीच्या पुराचा फटका बसल्याने त्याचे अनेक वेळा पुनर्बांधकाम झाल्याचेही संदर्भ आढळतात. त्यामुळे नदीकाठच्या या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीसमोरील आव्हाने जुनीच असल्याचे दिसून येते.
आज शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही हा मंदिर समूह अनेक पर्यटक आणि पुणेकरांच्या दृष्टीने तुलनेने अपरिचित आहे. ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याचे महत्त्व लक्षात घेता नियमित देखभाल, वास्तूंचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, परिसराची स्वच्छता आणि इतिहासाची माहिती देणारे फलक यांची गरज आहे.
असं एक मंदिर जिथे देवासोबत उंदरांचीही पूजा केली जाते; काय आहे यामागची प्रथा परंपरा ?
पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना शनिवारवाडा, लाल महाल यांच्याबरोबरच अशा तुलनेने दुर्लक्षित वास्तूंकडेही पाहणे आवश्यक आहे. अमृतेश्वर-सिद्धेश्वर मंदिर समूह हा पुण्याच्या धार्मिक परंपरेबरोबरच शहराच्या स्थापत्य आणि सामाजिक इतिहासाची दगडी साक्ष देणारा वारसा आहे. त्यामुळे या वारशाचे जतन करणे ही केवळ धार्मिक संस्थेची नव्हे, तर संपूर्ण शहराची जबाबदारी ठरते.






