
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग; कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे : पावसाळ्यात झालेली दुरवस्था लक्षात घेऊन तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार संबंधित यंत्रणांना दुरुस्तीची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची एकूण लांबी ५४ किलोमीटर आहे. त्यापैकी तुलनेने कमी खराब झालेल्या सुमारे ४० किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान एमआयडीसी पट्ट्यातील सुमारे १४ किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या भागातील खड्डे बुजविणे, साईड शोल्डरची दुरुस्ती आणि आवश्यक भरावाची कामे पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन या मार्गावरील सुमारे १२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या मार्गावरील काम एका वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री दिवंगत अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून रस्त्याच्या दुरुस्ती व काही भागाच्या रुंदीकरणासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने जानेवारी २०२६ मध्ये कार्यारंभ आदेश देऊन काही भागात काम सुरू केले होते. मात्र, रस्त्यालगतच्या विविध सेवा वाहिन्यांमुळे निर्माण झालेले अडथळे तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर उपलब्ध होण्यात आलेल्या अडचणींमुळे कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. आता पावसाळ्यात रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून कामाचा वेळोवेळी आढावा
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मार्गाची कायमस्वरूपी दर्जोन्नती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ( एमएसआयडीसी) काम हाती घेण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांत या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. दर्जोन्नतीनंतर मार्गाची वाहतूक क्षमता वाढण्यासोबतच भविष्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.