
राज्यात उष्णतेचा कहर सुरूच; दोन महिन्यांत उष्माघाताचे 6 बळी
पुणे : मे महिन्यातील कडक उन्हात आता हवामानातील बदलांची भर पडू लागली असून, राज्यात उष्णता आणि ढगाळ वातावरणाचा अनोखा संगम यावर्षी पाहायला मिळत आहे. कोमोरीन प्रदेशापासून नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत सक्रिय झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याची झळ कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुण्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर गेल्याचे दिसून येत आहे.
वातावरणाच्या खालच्या थरात कोमोरीन प्रदेश आणि लगतच्या भागावरील चक्रीय स्थितीपासून नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत द्रोणीय रेषा तयार झाली आहे. ही रेषा मराठवाडा आणि विदर्भ मार्गे जात असल्याने राज्याच्या हवामानात बदल होत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी (दि.८) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होते. संध्याकाळनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली; मात्र हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहिला.
दरम्यान, शनिवारी (दि. ९) पुण्यात कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून, किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. शहरात 38 अंश सेल्सिअस कमाल, तर २४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी
आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी समोर आली. शेतात कांदा काढणीच्या कामासाठी आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.