
गरिबाच्या फ्रीजला वाढली मागणी; कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग सुरू
पारगाव शिंगवे : सध्या उन्हाच्या झळा जाणू लागल्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला मागणी वाढली आहे. कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग वाढली आहे. परंतु, परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत व गावोगावी कमी किंमतीत माठ विक्रीस येत आहेत. यामुळे स्थानिक कारागिरांनी बनवलेले माठ विक्रीत घट झाली आहे. सर्व सामान्य लोकांना थंड पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीज घेणे परवडत नाही. त्यामुळे लोक थंड पाण्यासाठी माठ खरेदी करतात. या माठातील पाणी आरोग्यासाठी चांगले असते.
माठ बनविण्यासाठी नदी काठच्या परिसरातून पोयटा चिकणमाती गोळा करुन ती माती मळली चाळली जाते. त्यामध्ये राख व लिद टाकून भिजत ठेवली जाते. कारगीर चाकावर मातीचा गोळा ठेऊन त्याला माठाचा आकार देतात. तयार झालेल्या माठाला थोडे सुकून पुन्हा आकार देऊन माठाला मण्याच्या सह्याने घासून चकाकी देतात. माठ आव्यात (भट्टीत )ठेऊन ते भाजून काढले जातो. त्यानंतर माठ तयार होतो. या माठामध्ये पाणी थंड होते. या माठांचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी कायमच थंड रहात असते, असे माठ बनविणारे कारागीर यांनी सांगितले.
आधुनिक युगात तरुण पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवली. माठ बनवणारे कुशल कारागिरही मिळत नाहीत. जास्त कष्ट करुनही नफा चांगला मिळत नाही आणि त्यातच परराज्यातील परप्रांतीयांचा या व्यवसायात मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. यामुळे व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील कुंभारवाड्यामध्ये माठ मोठ्या प्रमाणात बनविले जातात. या ठिकाणी मंचर, खेड, शिरुर, जुन्नर तसेच पुणे येथुन व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. माठ खरेदी करुन विक्री घेऊन जातात. परंतु, या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव करून कमी दारात माठ विक्री करु लागले आहेत. त्यामुळे स्थानिक कुंभारवाड्यातील कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे व्यवसायिक सुभाष राऊत, रंगनाथ राऊत, सुरेश राऊत, खंडू राऊत यांनी सांगितले.
माठ शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तम
कुंभारवाड्यातील माठ चांगल्या दर्जाचे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून ते बनवले जातात. त्यामुळे कुंभार वाड्यात बनवलेले माठ उत्तम दर्जाचे असतात. त्याच्यामध्ये पाणी ओतल्यास ते हळूहळू थंड होते. यामधील पाणी कायमच थंड राहत असते. हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे, तसेच या माठातून पाणी झिरपत असल्याने हा माठ कायम थंड राहतो.
परप्रांतीयांनी बनवलेले माठ दर्जाहीन
परप्रांतीयांनी बनवलेले माठ हे लाल रंगाचे असतात. या माठाला बनवण्यासाठी कमी खर्च येतो व दर्जाहीन असतात. त्यामध्ये पाणी झिरपत नाही. यामुळे पाणी लवकर थंड होत नाही. तसेच जास्त वेळ पाणी त्याच्यामध्ये ठेवल्यास या माठामधील पाण्याची चवही बदलत असते. माठ हे दर्जाहीन असतात ते टिकण्यास कमी असतात.