सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०० पैकी तब्बल १९६.२५ गुण मिळवत जिल्हा परिषदेने अव्वल स्थान मिळवले. सेवाकर्मी कार्यक्रमातही जिल्हा परिषदेची ‘प्रथम’ क्रमांकाने निवड झाली आहे. मुंबईतील सह्याद्री सभागृहात झालेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन सात निकषांवर करण्यात आले होते. संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेनचा वापर, तसेच भौगोलिक माहिती प्रणाली या घटकांमध्ये पुणे जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेनं डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टिम (आय डब्लयूएमएस), ‘स्पंदन’, ई-लॉटरी, सिस्टम ऑफ पेन्शन इलस्ट्रेशन (एसओपीआय) आणि क्यूआर कोड आधारित करसंकलन प्रणाली यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाले आहे.
सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक
जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ द्विभाषिक व सुरक्षित असून ‘आपले सरकार’ प्रणालीत शंभर टक्के सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ई-ऑफिसमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून हजारो नस्त्या जलद निकाली काढल्या जात आहेत. स्मार्ट डॅशबोर्डमुळे डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळाली आहे. ‘पुणे झेडपी संवाद’ या व्हॉट्सअॅप एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ सेवा उपलब्ध होत आहेत. दरम्यान, सेवाकर्मी कार्यक्रमात ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून झालेली निवड ही सेवा गुणवत्ता, नागरिक समाधान आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेची पावती असल्याचे मानले जात आहे. या यशाचे श्रेय देताना पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
डिजिटल प्रशासन ही काळाची गरज
डिजिटल प्रशासन ही काळाची गरज असून नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी जि.प. कटिबद्ध राहील,” असे पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी या यशाला संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान असल्याचे सांगितले, तर उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला.






