सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण/ अतिश मेटे : सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक पातळीवरील वाढलेली आवक यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याला केवळ ८ ते ११ रुपये प्रति किलो दर मिळत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत कांद्याला सुमारे २० रुपये प्रति किलो दर मिळत होता. मात्र यंदा परिस्थिती पूर्णतः उलटली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि इस्राईल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतीय निर्यात व्यवहारावर परिणाम झाला आहे. परिणामी कांद्याची निर्यात मंदावली असून, बाजारभावावर दबाव वाढला आहे. यासोबतच, यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मात्र मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.
यासंदर्भात कांदा-बटाटा आडते असोसिएशनचे अध्यक्ष नयन लांडे यांनी सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहेत. निर्यात बंद असल्याने बाजारावर मोठा ताण आला आहे. आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.”
दरम्यान, शेतकऱ्यांकडून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला योग्य दर मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, निर्यात सुलभ करावी आणि बाजार स्थिर ठेवावा, अशी मागणी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, लवकर निर्णय न झाल्यास आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे सुद्धा वाचा : गॅस तुटवड्यावरून जनता आक्रमक; संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गच रोखला
मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत
कांद्याला सध्या ८ ते ११ रुपये प्रति किलो दर
मागील वर्षी याच काळात सुमारे २० रुपये दर
निर्यात मंदावल्याने बाजारावर दबाव
कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली
उत्पादन खर्चही निघणे कठीण






