
पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी भरुन ठेवा! आज सायंकाळी पाणीपुरवठा राहणार बंद
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामामुळे मंगळवारी (२८ एप्रिल) शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, बुधवारी (२९ एप्रिल) सकाळी देखील पाणीपुरवठा विस्कळीत आणि कमी दाबाने होण्याची शक्यता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.
नेमके कारण काय?
महापालिकेच्या वतीने सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि क्षेत्रीय स्तरावर पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल करणे आवश्यक आहे. भविष्यात पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा तांत्रिक बिघाड होऊ नये, यासाठी ही नियोजित दुरुस्ती केली जात आहे. मंगळवारी दिवसभर ही कामे चालणार असल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा मुख्य विसर्ग बंद ठेवण्यात येईल.
वेळापत्रकात झालेले बदल :
२८ एप्रिल (मंगळवार): संपूर्ण शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील.
२९ एप्रिल (बुधवार) : सकाळचा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होईल.
“निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा करून ठेवावा आणि काटकसरीने वापर करून सहकार्य करावे.” — प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.
पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट?
हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. वाढती लोकसंख्या, तसेच स्थलांतरित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक बनले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हवामान बदलामुळे मान्सून अनिश्चित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने सर्व विभागांना पाण्याच्या काटकसरीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांवरील अवलंबित्व लक्षात घेता, पावसाचे प्रमाण घटल्यास धरणसाठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.