सौजन्य - नवराष्ट्र टीम
पारगाव शिंगवे/लक्ष्मण ढोबळे : आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विहिरींमुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील अनेक रस्त्यांच्या कडेला या विहिरी अत्यंत कमी अंतरावर असून त्यांना कोणतेही संरक्षणात्मक कठडे, भिंत किंवा जाळी नसल्याचे चित्र समोर आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील मुख्य मार्गांसह वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. शाळकरी मुले, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच शेतकरी वर्गाची सततची ये-जा लक्षात घेता रस्त्यालगतच्या उघड्या विहिरी अपघातांना आमंत्रण देत असल्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात कमी दृश्यमानतेमुळे धोका अधिक तीव्र होतो. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी परिसरात अलीकडेच कार विहिरीत कोसळून शाळकरी मुलांसह एका कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, अशा प्रकारच्या दुर्घटना आंबेगाव तालुक्यातही घडू शकतात, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
विहिरींमध्ये वाहने, प्राण्यांचे अपघात वाढण्याची भीती
ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाहनांचा वेग जास्त असतो. वाहनावरील नियंत्रण सुटल्यास ती थेट विहिरीत कोसळण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी विहिरींना संरक्षणात्मक भिंत नसल्याने तसेच परिसरात उंच गवत वाढल्याने त्या दिसून येत नाहीत. पाणी पिण्यासाठी येणारी जनावरे गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या काठावरून घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी दिशाभूल झाल्याने बिबटे विहिरीत पडल्याच्या घटनाही वारंवार समोर येत आहेत.
उपाययोजनांची तातडीने गरज
तालुक्यातील धोकादायक विहिरींची तात्काळ पाहणी करून त्यांची नोंद घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित विहिरींना सिमेंट काँक्रीटची मजबूत भिंत, कठडे उभारणे, लोखंडी जाळी बसवणे, कुंपण करणे तसेच इशारा फलक लावणे या उपाययोजना तातडीने कराव्यात. याशिवाय रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी प्रकाश व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मत आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणीही सर्वसामान्यांकडून होत आहे.
भविष्यात अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जात असून, काही ठिकाणी पुलांवरील संरक्षक कठड्यांना रेडियम बसविण्यात आले आहे. तसेच विहिरींना लोखंडी जाळी बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोडेवाडी फाटा (पोंदेवाडी) येथे अष्टविनायक महामार्ग आणि बेल्हा-जेजुरी महामार्ग एकत्र येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यामुळे वाहतूक नियंत्रण, नियमभंग ओळखणे, अपघातांची कारणे समजणे तसेच आपत्कालीन मदत जलद मिळणे शक्य होणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. – सचिन कांडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पारगाव पोलीस ठाणे.






