वणव्यांच्या तडाख्यातून जंगलांची सुटका; सुखावणारा पाऊस, टेकड्यांनी घेतला मोकळा श्वास (फोटो सौजन्य: एआय)
उन्हाळ्याची चाहूल लागताच वाळलेल्या गवताला आग लावण्याचे प्रकार सुरू होतात. दरवर्षी फेब्रुवारीपासून मेपर्यंत वणव्यांचे प्रमाण वाढत जाते. यंदा फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्ह्यात २१० वणव्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या. वन विभागाने जाळपट्टे तयार करणे, गस्त वाढवणे अशा उपाययोजना केल्या; मात्र तरीही मार्चमध्ये वणव्यांची संख्या तब्बल ४०९ वर पोहोचली.
पुण्यातील वेताळ टेकडी, बावधन, पाचगाव, सिंहगड परिसरात दर दोन-तीन दिवसांनी आगीच्या घटना घडत होत्या. भोर, वेल्हे, कात्रज, जुन्नर या भागांमध्येही वणव्यांनी वनक्षेत्राचे नुकसान केले.
मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर परिस्थितीत बदल दिसून आला. अधूनमधून सुरू राहिलेल्या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आणि गवत ओलसर राहिल्याने आगी पसरण्याचा वेग मंदावला. परिणामी, पुणे शहरातील टेकड्या, पौड, नसरापूर, भांबुर्डा आणि वडगाव वन क्षेत्रात वणव्यांच्या घटनांमध्ये घट नोंदविण्यात आली. मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणि पावसाची स्थिती यावर पुढील नुकसानाचे चित्र अवलंबून राहणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.






