
Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत
दरम्यान, अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीच्या आढावा बैठकीत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी जलवाहिनी वाहून जाण्यास कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देत पर्यायी जलवाहिनीचे काम कोणत्याही परिस्थितीत तातडीने पूर्ण करून नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते. यापूर्वी सावित्री नदीपात्रातील गाळ उपसा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळेच जलवाहिनी वाहून गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप गटाच्या नगरसेवकांनी केला होता.
संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच पर्यायी जलवाहिनीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याने शहरावरील मोठे पाणीसंकट टळले आहे. पाणीटंचाईच्या काळात नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, उपनगराध्यक्ष संदीप जाधव तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.
जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला महापूर आला होता, या पुरात नदीपात्रातून गेलेली आणि अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली कुर्ला धरणाची मुख्य जलवाहिनी वाहून गेली. परिणामी, भर पावसाळ्यातही महाड शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरथठा करण्याची वेळ आली, तर नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या अमृत २ योजनेअंतर्गत दादली गावापर्यंत आलेल्या जलवाहिनीला जोड देत दादली पूल-भोई घाट-गवळ आळी मार्गे पर्यायी जलवाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत सलग वीस दिवस युद्धपातळीवर काम सुरू ठेवण्यात आले.