
Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात
वळगणीचा मासा हा प्रजननाच्या काळात नदीच्या प्रवाहात येत असल्याने या काळाला पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानले जाते. माशांच्या या प्रजनन काळात नदीतील जैवसाखळी टिकून राहण्यास मदत होते. दरवर्षी या हंगामात माशांना पकडण्यासाठी खवय्ये आणि मच्छीप्रेमींची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा जाळ्यात अडकण्याऐवजी हे मासे रासायनिक प्रदूषणाच्या मृत्यूच्या सापळ्यात अडकले आहेत. महाड औद्योगिक परिसरातील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील आमशेत ते खरवली बिरवाडी पुलापर्यंत या मृत माशांचा खच आढळून आला आहे. रोजगाराच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या उद्योगांच्या सावलीत नदी, निसर्ग आणि मानवी आरोग्याचा बळी जात असताना प्रशासनाचे मौन अधिकच अस्वस्थ करणारे ठरत आहे.
गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाचा आधार घेत काही उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्यात कारखान्यांच्या परिसरात साचवून ठेवलेले रासायनिक पाणी पावसाच्या प्रवाहाबरोबर थेट काळ नदीत मिसळल्याने हजारो माशांचा बळी गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
यापूर्वीही परिसरातील नाल्यांमधील रासायनिक पाण्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र अहवाल, नोटिसा आणि कागदोपत्री कार्यवाहीच्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याने प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणीय नियमांची कोणतीही भीती उरलेली नाही, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे. पावसाच्या आड रासायनिक सांडपाणी नदीत सोडण्याचा प्रकार दरवर्षी घडत असताना प्रशासन मात्र घटनांनंतरच जागे होत असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, नदीत मृत किंवा तडफडणारे मासे काही नागरिकांकडून गोळा केले जात असल्याचे चित्रही समोर आले आहे. दूषित रसायनांच्या संपर्कात आलेले हे मासे आरोग्यास घातक ठरू शकतात, असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला असून ते न खाण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. काळ नदीचे पाणी शेती, पशुधन आणि दैनंदिन वापरासाठी उपयोगात आणणाऱ्या हजारो नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. जलचर, वन्यजीवन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या प्रदूषणावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.