Raju Shetti: वर्णेतील एमआयडीसीचा शिक्का कायमचा पुसण्यासाठी ताकदीने लढा देऊ. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा निर्वाणीचा इशाराही शेट्टी यांनी दिला.
COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
Follow Us:
Follow Us:
विस्तार
वर्णेतील एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची एक इंचही जमीन अधिग्रहित करू देणार नाही.
सातारच्या वर्णे येथे एमआयडीसीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा संपन्न.
शेती ही केवळ जमिनीचा उतारा नसून पुढच्या पिढीचे भविष्य असल्याचा पुनरुच्चार
Varne MIDC Satara: विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांना त्यांच्या मातीपासून बेदखल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांची एक इंचही जमीन घेण्याचा प्रयत्न केला, तर शेतकरीविरोधी राजकारण करणाऱ्यांना मुळापासून उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा घणाघाती इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी दिला.
वर्णे (ता. सातारा) येथे एमआयडीसीविरोधात आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, प्रवीण धस्के, अर्जुन साळुंखे, दादासाहेब यादव, मनोहर येवले, रमेश पिसाळ, दत्ता थोरात, विक्रमसिंह फडतरे आदी उपस्थित होते.
राजू शेट्टी यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार करताना सांगितले की, विविध आरक्षणे, प्रकल्प आणि योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांना शेतीतून हद्दपार करण्याचे धोरण सुरू आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखालीही जमिनी घेण्याचा उद्योग सुरू आहे. वर्णे येथे २०१३ मध्ये एमआयडीसीसाठी अधिसूचना काढण्यात आली. शेतकऱ्यांची संमती आहे की नाही, याची पर्वा न करता जमीन घेण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा प्रकार तातडीने थांबला पाहिजे.
“शेतकऱ्याची जमीन म्हणजे केवळ सात-बारा उतारा नाही; ती त्याच्या पुढच्या पिढीची भाकरी आणि भविष्य आहे. विकासाच्या नावाखाली ही जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला शेतकरी ताकदीने उत्तर देईल,” असा स्पष्ट इशारा शेट्टी यांनी दिला.
‘एमआयडीसीचे १३ वर्षांचे भूत कायमचे गाडणार’
राजू शेळके यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. वर्णे येथील २०१३ पासूनचे एमआयडीसीचे भूत कायमचे गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांची एकजूट हीच आपली वज्रमूठ असून, एमआयडीसी रद्द करून सत्तेच्या जोरावर सुरू असलेल्या राजकारणाचा हिशोब चुकता करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“बाधित शेतकऱ्यांना २० वर्षे भूविकास बँकेचा आणि १३ वर्षे एमआयडीसीचा शिक्का सहन करावा लागत आहे. आता हा अन्याय आणखी किती वर्षे सहन करायचा? संबंधित लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी शेळके यांनी केली.
प्रवीण धस्के व अर्चना देशमुख यांनीही पुढील पिढीच्या भवितव्यासाठी शेतजमीन शाबूत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत, एमआयडीसीचे शिक्के उठविल्याशिवाय लढा थांबवू नका, असे आवाहन केले. २०१३ पासून एमआयडीसीच्या नावाखाली जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
वर्णेतील एमआयडीसीचा शिक्का कायमचा पुसण्यासाठी ताकदीने लढा देऊ. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा निर्वाणीचा इशाराही शेट्टी यांनी दिला.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात शेट्टींचे स्वागत
एल्गार सभेपूर्वी राजू शेट्टी यांची गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी जयसिंग काळंगे, योगेश काळंगे, अमोल पवार, रत्नदीप कणसे, कर्नल शरद केंजळे, सैनिक किशोर पवार, गणेश काळंगे, लक्ष्मण वाघमोडे, बळीराम वाघमोडे, नाना देवकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपुत्रांसाठी काय केले, याची श्वेतपत्रिका काढा!
“राज्यात एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या किती जमिनी घेतल्या? किती सरकारी जमीन वापरली? भूमिपुत्रांना किती प्लॉट दिले? किती जणांना उद्योग मिळाले? सुशिक्षित बेरोजगारांना किती कर्ज दिले?” या प्रश्नांची उत्तरे सरकारने जनतेसमोर द्यावीत. एमआयडीसीच्या नावाखाली झालेल्या जमीन संपादनाची आणि भूमिपुत्रांना मिळालेल्या लाभांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
जाहिरात
जाहिरात
Web Title: Raju shetti warns government over varne midc land acquisition in satara