भाट्ये समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण (फोटो- सोशल मिडिया)
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालय विकसित करणे, गणपतीपुळे विकास आराखडा आणि भाट्ये बीच सुशोभिकरण सादरीकरण याबाबत बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एम एस कुलकर्णी, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, कार्यकारी अभियंता आमोल ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, येत्या दोन वर्षांत हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले केले जाईल. भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी एकूण १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून, या निधीतून प्राधान्याने करावयाच्या कामांची रूपरेषा अंतिम करण्यात आली आहे.
गणपतीपुळे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी १०२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. यातील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला, या प्रकल्पातील उर्वरित निधी तातडीने मिळावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला जात असून, गणपतीपुळ्याची सर्व कामे में २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक, भाविक यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामपंचायत व एमटीडीसीप्रमाणे संस्थानानेही जीवरक्षक नेमावेत. या जीवरक्षकांना किमान वेतन मिळायला हवे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी बैठकीत केली.






