रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या त्या विधानावरून सनसनीत टोला लगावला आहे.
रामदास आठवलेंसारखं मंत्री व्हायचं असेल तर मी माझा पक्षच बंद करेन, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकदा केली होती. त्यावर रामदास आठवले यांनी, मी आता मंत्री बनलोय तर राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष बंद करावा, असा टोला लगावला आहे. मी दलित पँथर काळापासून संघर्ष केला आहे. त्यामुळेचं मला मंत्रिपद मिळालं. राज ठाकरे यांना बोलूद्या, माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, असंही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असली तरी महायुतीसाठीच निवडणूक सोपी असेल. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याच्या अपप्रचारामुळे आमचं मोठं नुकसान झालं. तरी मतदानाचा टक्का जास्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला 170 पर्यंत जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रामदास आठवले यांच्या आरपीय पक्षाने महायुतीकडे ३ जागा मागितल्या होत्या. मात्र महायुतीकडून केवळ १ जागा आरपीआयला सोडण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारही करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरही आठवलेंनी स्पष्टीकरण दिलं.आरपीआयला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजीचा सूर होता मात्र मी तो दूर केला आहे. विधानसभेला एकच जागा मिळाली असली तरी एक विधानपरिषदेची जागा देण्यात येणार आहे. शिवाय महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. महायुतीचे 17 उमेदवार लोकसभेला जिंकले त्यात आमच्या पक्षाच्या मतांचा वाटा मोठा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते अरविंद सावंत यांना इम्पोर्टेड माल असं म्हटलं होतं. शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर अरविंद सावंत यांच्यार गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अरविद सावंत यांच्या या विधानानंतर भाजपकडून टीकेची झोड उठली आहे. त्यावरही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद सावंत खरं तर चांगलं कल्चर असलेले खासदार आहेत. शायना एन सी यांना माल म्हणणे त्यांच्यासारख्या नेत्याला शोभत नाही, ही गंभीर बाब आहे. शायना यांचा अपमान म्हणजे सर्व महिलांचा अपमान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली असून सोबतच महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन कारवाई करावी, असं आठवले यांनी म्हटलं आहे.