
जगताप म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी पक्षाचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र प्रशासनाने अर्जात तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून प्रक्रिया थांबवली. सांगितलेल्या चुका दुरुस्त करून शुक्रवारी पुन्हा अर्ज सादर करण्यात आला, तरीही नव्याने त्रुटी काढण्यात आल्या. दिवसभर सदस्य व पदाधिकारी प्रतीक्षा करत असतानाच गट नोंदणी न करताच जिल्हाधिकारी निघून गेल्याचा आरोप त्यांनी केला. “प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली काम करू नये. कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे तेच करावे,” असे स्पष्ट करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायाची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात व्हीपच्या अधिकारावरून दोन दिवसांपूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. गटनेत्याकडे व्हीपचे अधिकार असणे आवश्यक असताना जिल्हाध्यक्षांनी ते स्वतःकडे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नेत्यांमधील चर्चेनंतर व्हीप अधिकारासंदर्भातील पत्र नव्याने सादर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट केले. तरीही शुक्रवारी रात्रीपर्यंत गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती.
दरम्यान, जिल्हा परिषद सत्तास्थापनेबाबत भूमिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची शुक्रवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा अपेक्षित होती. मात्र जिल्ह्यातील कोणताही नेता या बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीसोबत जाण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून दबाव असल्याची चर्चा असली तरी जिल्ह्यातील बहुतांश नेते महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या भूमिकेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेचे समीकरण आता नव्या राजकीय वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले सदस्य गट नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे गेले होते. अर्जाची तपासणी करताना सावित्री रवि-पाटील यांच्यासह एका सदस्याच्या नावात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने अर्ज दुरुस्त करून पुन्हा सादर करण्यास सांगितल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.