सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले (Photo Credit - X)
निवडणुकीपूर्वी भाजपकडून सत्तास्थापनेचे जोरदार दावे करण्यात येत होते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आमदार रोहित पाटील, सुहास बाबर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. या चर्चेनंतर शिवसेनेच्या शीतल बाबर यांना अध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला ठरणार आणि त्यासाठी रोहित पाटील गटाचे काही सदस्य गैरहजर राहतील, अशी जोरदार चर्चा रंगली होती.
मात्र प्रत्यक्षात दुपारी मतदानाच्या वेळी रोहित पाटील गट एकसंघपणे सभागृहात उपस्थित राहिला आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार का, याबाबत निर्माण झालेली उत्कंठा अखेर फोल ठरली.
दरम्यान, सभागृहात भाजपचे सर्वच नेते उपस्थित असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले होते. तर शितल बाबर यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला होता,सत्तांतराची शक्यता गृहित धरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र शीतल बाबर यांनी अर्ज मागे घेतला व अखेरच्या क्षणी समीकरणे बदलली नाहीत आणि महाविकास आघाडीने सत्ता राखण्यात यश मिळवले.
या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पुतणी आहेत. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांना संधी देण्यात आली. एकूणच, रोहित पाटील गटाबाबत पसरलेल्या अफवा निराधार ठरल्या असून महाविकास आघाडीची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सुहास बाबर आणि आमदार रोहित पाटील यांच्यातील निकटच्या मैत्रीची जोरदार चर्चा रंगली होती. या संबंधांमुळे रोहित पाटील हे शिवसेनेच्या शितल बाबर यांच्या अध्यक्षपदासाठी अनुकूल भूमिका घेतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता; मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत रोहित पाटील यांनी अखेरपर्यंत पक्षनिष्ठा जपून महाविकास आघाडीच्या बाजूनेच भूमिका कायम ठेवली. तरीही बाबर-पाटील मैत्रीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या चर्चांना मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि त्यातूनच अफवांना अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.






