गावच्या राजकारणात मोठा भूकंप! (Photo Credit- AI)
चिंचणी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०२२-२३ मध्ये पार पडली होती. त्या वेळी थेट लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत सदाशिव माळी हे बिनविरोध निवडून आले होते. माजी खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. दोन्ही गटांच्या सहमतीनेच माळी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली होती.
गेल्या सव्वातीन वर्षांपासून माळी यांनी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत विविध विकासकामे राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकाळाला अजून दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बिनविरोध निवडणुकीतून सत्तेवर आलेल्या नेतृत्वानेच मध्यंतरात पदाचा राजीनामा दिल्याने गावातील राजकीय समीकरणे पुन्हा हलू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे चिंचणी हे माजी खासदार संजय पाटील यांचे गाव असल्यामुळे येथील ग्रामपंचायतीतील प्रत्येक राजकीय हालचालीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे सरपंचाचा अचानक झालेला राजीनामा हा केवळ वैयक्तिक निर्णय आहे की गावातील राजकीय समीकरणांतील नव्या घडामोडींचा संकेत, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता व्यक्त होत आहे.
आता रिक्त होणाऱ्या सरपंचपदावर कोणाला संधी मिळणार, कोणता गट पुढे सरसावणार आणि गावातील पुढील राजकीय पटावर कोणते नवे समीकरण उभे राहणार, याकडे ग्रामस्थांसह तालुक्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माळी यांनी तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक अविनाश पाटील यांच्याकडे लेखी राजीनामा सादर केला असून त्याबाबतची पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
“ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सव्वातीन वर्षे झाली. या काळात गावाच्या विकासासाठी शक्य तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे सरपंच पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.”
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले






