Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मनोज दादा जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सातारा गॅझेट तातडीने लागू करण्याचा आदेश काढावा, अशी आक्रमक मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात छत्रपतींची गादी आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील दोन्ही छत्रपतींनी पुढे यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध करत आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, मराठा समाजाच्या मागण्यांवर लवकर तोडगा निघाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. मराठा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेत, “आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा ठाम पाठिंबा असून, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर यापुढील आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल,” असा इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पहिली ठिणगी वाई तालुक्यातून पडली असून, आता ही ठिणगी अधिक मोठ्या आंदोलनात रूपांतरित करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे, असेही यावेळी समन्वयकांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता वाई पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहनांमधून वाई पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.पोलिसांची सतर्कता आणि मराठा आंदोलकांमधील समन्वयामुळे आंदोलनाला कोणतेही गालबोट लागले नाही. कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.
या आंदोलनातून वाई तालुका सकल मराठा समाजाने सरकारला थेट संदेश दिला असून, मराठा समाजाची मागणी केवळ घोषणांपुरती राहणार नसून निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवला जाईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. शिवतीर्थ येथे आंदोलनाची सांगता करताना सातारा गॅझेटचा तात्काळ आदेश काढावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
सरकारने या मागणीची दखल घेतली नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि निर्णायक स्वरूपाचे असेल, असा स्पष्ट इशारा मराठा समन्वयकांनी दिला. वाईच्या रस्त्यावर उमटलेला हा एल्गार आता सातारा जिल्ह्यातील मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






