पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात
मूर्तिजापूर : पावसाळा अर्ध्यावर येऊन ठेपला असतानाही तालुक्यातील अनेक नदी-नाले अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंतेत असून, आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास त्याचा थेट परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर तसेच पुढील रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या पावसाळ्यात काही भागात पावसाच्या सरी झाल्या असल्या तरी पावसात सातत्य नसल्याने नदी-नाल्यांना अपेक्षित प्रवाह आलेला नाही. परिणामी, भूजलपातळी वाढण्यासही मर्यादा येत असून विहिरी, बोअरवेल तसेच अन्य जलस्रोतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात यापूर्वीही कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाच्या वितरणातील असमानता हा यंदाच्या हंगामातील चिंतेचा विषय ठरत आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती
सध्या अनेक नदी-नाले कोरडे असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच जलस्रोतांची स्थिती, भूजलपातळी आणि गावनिहाय पाणी उपलब्धतेचा आढावा घेऊन संभाव्य पाणीटंचाईवर आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
उत्पादनावर परिणामाची शक्यता
खरीप पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असताना पावसात पडणारा खंड शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा टिकून राहिला नाही तर पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे उत्पादन समाधानकारक राहील की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.
आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांना प्रवाह येऊन जलसाठ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्यास त्याचे परिणाम पुढील काही महिन्यांत अधिक प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याचे उर्वरित दिवस तालुक्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून, वरुणराजाची दमदार हजेरी लागून नदी-नाल्यांना प्रवाह येतो का, याकडे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
भूजलसाठ्यावरही परिणामाची शक्यता
पावसाचे पाणी जमिनीत पुरेशा प्रमाणात मुरले नाही तर भविष्यात भूजलसाठ्धावरही परिणाम होऊ शकतो, पावसाळ्यानंतर नदी-नाल्यांमधील प्रवाह टिकून राहण्यासाठी भूजलाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे उर्वरित कालावधीत दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Sugar Black Marketing : साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु






