
मुंबई : मागील काही दिवसांमध्ये राजकारणामध्ये वाढत्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक राजकारण्यांचे गुंडांसोबतचे फोटो, मंत्रालयातील गुंडांची व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच राजकीय वादातून थेट गोळ्या झाडून हत्या केली जात आहे. या सर्व प्रकारावर राजकारण तापले असून गृहमंत्री (DCM Devendra Fadnavis) व मुख्यमंत्र्यांवर (CM Eknath Shinde) विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर आता शिवसेनेचे (Shivsena) खासदार व प्रवक्ते संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी टीका करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.
वाढत्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणातील हस्तेक्षेपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मंत्रालयात गुंड मुख्यमंत्री व त्यांच्या बाळराजांना भेटायला येत आहेत. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स हे गुंड व माफिया लावत आहेत. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स गुंडांना दिले जातात. 8 हजार कोटींचे ऍम्ब्युलन्सचे कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळाले आहे ? त्यामध्ये किती माफिया सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल. शिंदे यांच्या टोळीमध्ये गुंड व पोलिस एकाच टोळीत आहेत.कल्याणला गणपत गायकवाडांनी गोळीबार केला. त्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचे नाव आले होते.एकनाथ शिंदेंची पोलिसांनी लगेच चौकशी करायला हवी होती. दुसरे कोणी असते तर त्याची चौकशी केली असती. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते पण महाराष्ट्रात गुंडाना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री यांना जाब विचारला जात नाही. गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार” अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
फडणवीस हे अतिशय अपयशी व अकार्यक्षम गृहमंत्री
ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “काल घोसाळकरांची निर्घुण हत्या झाली आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे कधीच घडले नाही. पुणे, नगर, राहौरी इथे हत्या झाल्या आहेत पण, आता मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली आहे. पण आता राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? आता ते अदृश्य झाले आहेत. गृहमंत्री विदर्भात ‘चाय पे चर्चा’ करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा कधी होणार ? अतिशय अपयशी व अकार्यक्षम गृहमंत्री आहात. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला महाराष्ट्रात नवीन खून करण्याची सुपारी घ्यायला गेले आहेत का ?” असा गंभीर सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. “नरेंद्र मोदी व अमित शाह हे या राज्याचे गुन्हेगार व अपराधी आहेत. त्यांनी हे सरकार महाराष्ट्रावर लादलेले आहे. हे सरकार बरखास्त करा व राष्ट्रपती राजवट लावा. तुमचे आमदार,खास पोलिसांना धमक्या देत आहेत.याला कायद्याचे राज्य म्हणतात का ?” अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.