
पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’
विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर 4 जून 2026 ला काँग्रेसमार्फत मटका फोड आंदोलन करण्यात आले. यावर आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ९ जून रोजी महिलांचा ‘टमरेल मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर करून तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी सलग तीन ते चार दिवस पाणी मिळत नाही. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त
शिवसेनेने प्रशासनाकडे शहरातील सर्व भागांमध्ये नियमित आणि समान पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. ज्या भागांमध्ये तीव्र टंचाई आहे, तेथे महानगरपालिकेच्या खर्चाने मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठ्याचे प्रभागनिहाय वेळापत्रक जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करून पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त पाणी कोट्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून दीर्घकालीन नियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या ९ जून रोजी शेकडो महिला आणि नागरिकांच्या सहभागाने महापालिकेवर ‘टमरेल मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. या मोर्चाद्वारे आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे निशा नार्वेकर यांनी सांगितले. प्रशासनाने ९ जूनपूर्वी ठोस पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या जनक्षोभाची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.