
गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, 'मरे'वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा
या मृत्यूंच्या मागे प्रमुख कारण म्हणून प्रचंड गर्दीकडे बोट दाखवले जात आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा आणि वाढलेला प्रवासी ताण यामुळे लोकलमधील प्रवास दिवसेंदिवस कोंडीत अडकत चालला आहे.कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि अन्य कारणांसाठी मुंबईकडे दररोज लाखो प्रवासी धाव घेतात, मात्र ट्रेन वेळेवर न येणे, वेळापत्रकात सतत बदल, अचानक गाड्या रद्द होणे आणि डब्यांमधील असद्दा गर्दी यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी १२वीच्या परीक्षेला जात असताना एका विद्यार्थ्यांचा रेल्वेमधून पडून झालेला दुर्दैवी मृत्यू हा गर्दीच्या भीषणतेचा आणखी एक वेदनादायक दाखला ठरला. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे आणि मुंबईकडे धावणाऱ्या लोकलमध्ये वाढती गर्दी, प्लॅटफॉर्मवरील गोंधळ आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. गर्दी नियंत्रणासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वेळा प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासही जागा नसल्याचे दृश्य पाहायला मिळते, उपनगरी रेल्वे सेवा ही शहराच्या गतीची धुरीण असली तरी आज तीच सेवा प्रवाशांसाठी त्रासदायक आणि जीवघेणी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वे मार्गावर वर्षाकाठी सुमारे २१८० अपघाती मृत्यू होत आहेत. केवळ ठाणे स्टेशन परिसरातच वर्षभरात २८७ अपघातांची नोंद होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून, एसी ट्रेनची गरज मान्य असली तरी सलग एसी गाड्या चालविण्यापेक्षा दोन एसी ट्रेनदरम्यान दोन ते तीन साध्या लोकल सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दीचा निचरा होण्यास मदत होईल. मुंब्रा स्टेशनवर कौसा आणि शिळ परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी येत असल्याने तेथे ‘होम प्लॅटफॉर्म’ची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आगामी काळातील शैक्षणिक परीक्षांची वेळ गर्दीच्या शिखर काळात ठेवू नये, यासाठी शिक्षण खात्याला विनंती करणार आहे.