
वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा
बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. यापैकी एका टप्प्याचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील तब्बल १३८.४५ कोटी रुपयांचा निधी लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा आणि तिसऱ्या लेनच्या प्रकल्पातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने पाठपुरावा करण्यात आला. तसेच शिवसेना आमदार राजेश मोरे आणि मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.
कल्याण-शीळ मार्ग हा डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते आणि वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. तिसऱ्या लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार असून, कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या निर्णयानंतर बाधित शेतकऱ्यांनी डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत एकत्र येत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार राजेश मोरे, माजी आमदार राजू पाटील, खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न सुटल्याने तिसऱ्या लेनच्या कामातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला असून, आता प्रकल्पाच्या पुढील कामांना वेग येण्याची शक्यता आहे.