
ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. सहकार क्षेत्र अधिक मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी महायुतीचे वर्चस्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि विविध लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक संस्था मानली जाते. या बँकेमार्फत शासकीय योजनांचे अनुदान, कर्जवाटप आणि आर्थिक मदत वितरित केली जाते. त्यामुळे बँकेच्या कारभारावर सक्षम नेतृत्व असणे गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यंदा प्रथमच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येत ‘परिवर्तन पॅनल’ उभे केले आहे. या पॅनलची निवडणूक निशाणी ‘छत्री’ आहे.
विविध मतदारसंघांतून महायुतीने खालील उमेदवारांना संधी दिली आहे:
हाऊसिंग मतदारसंघ – सीताराम राणे
पतसंस्था मतदारसंघ – प्रभू पाटील
महिला मतदारसंघ – दीपाली पाटील, सुवर्णा पावशे
अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ – पांडुरंग बरोरा
ओबीसी मतदारसंघ – हार्दिक राऊत
भटक्या-विमुक्त जमाती मतदारसंघ – राजेंद्र घोलप
विविध कार्यकारी संस्था मतदारसंघ – ज्योती पाटेकर (जव्हार), अनिल गावंड (पालघर), विद्या वेखंडे (शहापूर), संदीप पावडे (विक्रमगड)
महायुतीच्या सर्व उमेदवारांना ‘छत्री’ या निवडणूक चिन्हासमोर मतदान करून विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले. सहकार क्षेत्रातील विकास, पारदर्शकता आणि शेतकरी हितासाठी परिवर्तन पॅनलला पाठिंबा देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या निवडणुकीत महायुतीच्या एकजुटीची मोठी परीक्षा लागणार असून, ठाणे-पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.